जिल्हय़ात मुसळधार पावसाने उडवली दाणादाण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुसळधार पावसाने कहर केला असून जिल्हय़ातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात ठिकठिकाणी पूरस्थिती तर काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. केळय़े-ठिकवाडी व चिंद्रवली येथे लोकवस्तीकडे जाणाऱया रस्त्यांना मोठय़ा भेगा पडून ते खचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर वादळी पावसामुळे अनेक घरे व गोठा यांचेही हजारोंचे नुकसान झाले. मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी, शास्त्राr व सोनवी नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली आहे. चिपळुणातही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.
जिल्हय़ात गेल्या 5 दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाचा दिवसागणिक जोर वाढला आहे. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती उभी आहे. नद्यानाले दुथडी ते धोका पातळीच्या बाहेर वाहत आहेत. तालुक्यातील काजळी नदीकाठचा परिसर मंगळवारीही पुराच्या पाण्याखाली होता. त्यामुळे येथील शेतीला मोठा फटका बसण्याची दाट शक्यता परिसरातील शेतकऱयांतून व्यक्त होत आहे. मुसळधार पावसामुळे सोमवारी काजळी नदीचे पाणी चांदेराई बाजारपेठेत घुसले. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली. पण हे पाणी मंगळवारी सकाळपर्यंत बाजारपेठेतून न ओसरल्याने तेथे मोठय़ा प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तासानंतरही बाजारपेठेत पाणी होते. चांदेराईसह हरचिरी, सोमेश्वर, तोणदे, हातीस या भागात पुराचे पाणी शिरले होते. सोमवारी रात्रीपासून या परिसरात विद्युत प्रवाहही खंडित झाला होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची वीजेविना गैरसोय झाली. नदीच्या पुरामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावरचा चिखल दूर करण्यासाठी जरूर ती उपाययोजना करावी व तत्काळ पंचनामे करून पूरग्रस्तांना तत्काळ शासनाने मदत द्यावी, अशी आग्रही मागणी चांदेराईचे माजी सरपंच दादा दळी यांनी केली आहे. दरवर्षी पावसाळ्य़ात पुराचे पाणी या बाजारपेठेत व बाजारपेठेशेजारी लोकवस्तीत जाते. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्याने दरवर्षी ग्रामस्थांना या परिस्थितीला समोरे जावे लागत असल्याची नाराजी चांदेराईचे माजी सरपंच दादा दळी यांनी व्यक्त केली आहे.
या मुसळधार पावसाचा फटका तालुक्यातील केळय़े गावातील ठिकवाडी येथील ग्रामस्थांना बसला आहे. या वाडीकडे जाणारा रस्त्याला मोठय़ा प्रमाणात भेगा पडल्या. त्यामुळे रस्ता सुमारे 10 ते 15 मीटर दूर अंतरापर्यंत खचला आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. चिंद्रवली निरखुणेवाडी येथीलही रस्ता पावसामुळे मोठय़ा प्रमाणात भेगा जाऊन खचला. त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली. पण येथील ग्रामस्थांना पर्यायी रस्ता उपलब्ध असल्याने त्या मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना प्रशासनस्तरावरून करण्यात आल्या आहेत. दरम्यान दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी व नारंगी नद्या दुथडय़ा भरून वाहत आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. राजापूर तालुक्यात गेले 4 दिवस संततधार सुरू आहे. या पुरामुळे अर्जुना व शुकनदीकाठी असलेल्या शेतात पाणी घुसले आहे. दापोलीत गेले तीन-चार दिवस पावसाचा जोर असतानाच वाऱयाच्या वेगाची तीव्रता मात्र वाढली आहे. यामुळे झाडे पडून वीजखांबांचे नुकसान झाले आहे.
अनेक भागात घरांची पडझड
रत्नागिरी तालुक्यातील जाकीमिऱया येथे सदानंद कृष्णाजी शिवलकर यांच्या घराची पडझड होऊन 6 हजार रुपयांचे नुकसान झाले. खेडशी येथील चंद्रकांत केशव सावंतदेसाई यांच्या घरांचे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले. धामणसे येथील सुवर्णा सुरेश रेवाळे यांच्या घराचे 10 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले. कासारवेली येथील दीपक वामन शिवलकर यांच्या घराचे 6,600 रुपयांचे नुकसान झाले. वैद्य लावगण येथील प्राथमिक शाळेच्या शौचालयाची पडझड होऊन 4600 रुपयांचे नुकसान झाले. खरवते येथील रवींद्र सुधाकर सागवेकर यांच्या घराचे 3800 रुपयांचे नुकसान झाले. शिवारआंबेरे येथील गोकुळ गोविंद पेजे यांच्या मालकीच्या गोठय़ाचे 6525 रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार प्रशासनाकडून देण्यात आली.
पुराच्या पाण्यातून वासराने चांदेराई पूल केला पार
काजळी नदीच्या पुराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी या नदीवरील चांदेराई पुलावरून वाहत असल्याने पुलावर एका वासराने कमाल केल्याचा प्रत्यय नागरिकांना आला. पुलावरून पुराचे वेगाने वाहत असताना त्या पाण्यात वासरू पुढे सरसावले आणि मोठय़ा शर्थीने त्या वासराने पूल अगदी लिलया पार केला. हे पाहून उपस्थित साऱयांनी आश्चर्य व्यक्त केले. हा प्रसंग उपस्थितांनी आपल्या मोबाईलमध्ये कॅमेराबद्ध केला आणि तो व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.