वृत्तसंस्था /ढाका
भारत आणि यजमान बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सध्या खेळविली जात आहे. बांगलादेशने या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतावर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. आता या मालिकेतील तिसरा आणि औपचारिक सामना होणार असून या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, दीपक चहर आणि कुलदीप सेन दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत, अशी माहिती भारतीय संघ व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी या बातमीला अधिकृत दुजोरा दिला आहे. कर्णधार शर्माच्या बोटाला दुखापत झाली असून तो लवकरच मुंबईतील एका तज्ञ डॉक्टराशी संपर्क साधणार आहे. ही वनडे मालिका झाल्यानंतर खेळविल्या जाणाऱया दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माच्या सहभागाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्याच्या दुखापतीचे स्वरुप निश्चित झाल्यानंतरच तो कसोटी मालिकेत खेळेल किंवा नाही, हे स्पष्ट होईल. भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने ढाका येथे बुधवारी झालेल्या दुसऱया सामन्यात केवळ 3 षटकांची गोलंदाजी केली. दुखापतीमुळे त्याला आपल्या गोलंदाजीचा कोटा पूर्ण करता आला नाही. नवोदित गोलंदाज कुलदीप सेन याची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने तो शेवटच्या सामन्यात खेळू शकणार नाही. या दुखापतीमुळे त्याला बुधवारच्या दुसऱया सामन्यातही खेळता आले नव्हते.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱया सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना कर्णधार रोहित शर्माच्या हाताच्या अंगठय़ाला झेल टिपताना ही दुखापत झाली होती. या दुखापतीतून रक्तस्राव सुरू झाल्याने त्याने मैदान सोडले होते. पण भारताच्या डावामध्ये तो सलामीला फलंदाजीस येऊ शकला नाही. दरम्यान, संघाला गरज असल्याने तो दुखापतीच्या अवस्थेत तळाच्या क्रमांकावर मैदानात उतरला आणि त्याने आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी आक्रमक फटकेबाजी केली. भारताला हा सामना केवळ पाच धावांनी गमवावा लागला. त्याने दमदार अर्धशतक झळकविले. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानने हे शेवटचे षटक टाकले. या षटकामध्ये त्याने 20 धावा दिल्या.