संध्याकाळ झाली की दिवसभरात कुठेतरी हरवून गेलेले माणसाचे अस्तित्व त्याला एकदम सामोरे येते. जन्मजन्माच्या जखमेवरची खपली हळूच निघते आणि आठवणींच्या भुलावणीत माणूस फसून जातो. जगलो ते गाव, ती भोवतीची रम्य सृष्टी, ते घर, ती माणसे आणि काळाने गिळून टाकलेले वय हे सारे आठवते ते आयुष्याच्या संध्याकाळी. मग ते कुणाला तरी सांगावेसे वाटते आणि त्यातून साकार होतात ती आत्मचरित्रे. वळणावरच्या पाण्यासारखे, कधीही न सांगता हलकेच निसटून जाणारे माणसाचे आयुष्य. हे जाणूनही तेच सुगंधी, चिरंजीव करण्याची त्याची धडपड म्हणजे त्याच्या जगण्याची गोष्ट असते. ‘संध्याकाळ’ मावळतीचा केशरी सूर्य बुडून जाणारी असो किंवा पैलतीरी लागलेल्या नेत्रांची असो, माणसाला अंतर्मुख करते हे मात्र निश्चित.
अंधार कुठून येतो बरे? आपल्याला वाटते तो आकाशातून येतो, परंतु तसे नाही. तो पृथ्वीच्या पोटातून येतो. पृथ्वीवर अंधाराचे साम्राज्य पसरवीत वर आकाशाकडे जाणाऱया अंधाराची भेट निरोप घेणाऱया सूर्याशी होते तेव्हा निर्माण होतो संधिप्रकाश. त्याच्या विलोभनीय रंगच्छटा बघितल्या की माणूस हळवा, ओला होतो. त्याला वाटते आपण आलो कुठून? जाणार कुठे? या पृथ्वीवरच्या आपल्या अस्तित्वाचे खरेच काही मोल आहे का? स्वअस्तित्वाच्या शोध मोहिमेमध्ये खरेच त्याला काही गवसते का? भास व्हावेत तसे हेही क्षण आयुष्यातून वजा होतात हेच खरे. हा नियतीचा खेळ असतो. एकदा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना कुणा एका संशोधकाने म्हटले की, ‘महाराज, महाभारतात द्रौपदीचे वस्त्रहरण मुळी झालेलेच नाही. मी अभ्यास केला आहे. तुम्हाला हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवतो.’ महाराज हसले. म्हणाले, ‘ठीक आहे. तुम्ही म्हणाल तसे आम्ही मानू. पण एक लक्षात घ्या. माणसाचे वस्त्ररुपी वय रोज एकेका दिवसाने हरण करणाऱया दुःशासनरुपी काळाला जाणून तरी कृष्णाला हाक मारा.’ रोजच्या अपरिहार्यपणे सामोऱया येणाऱया संध्याकाळचे हेच मर्म आहे. सांज माणसाला विचारते, ‘अरे माणसा, आजच्या दिवसाचे फलित काय? नरदेहाचे सार्थक व्हावे असे काही सत्कर्म केले आहेस का? त्या परमात्म्याचे स्मरण तरी तुला होते का? काळाच्या उदरात गडप झालेल्या अनेक माणसांच्या वाटेवर तुझे पाऊल पडते आहे त्याची जाणीव तुला आहे का?’
अंतर्मुखता हे संध्याकाळचे वैशिष्टय़ आहे. संध्याकाळचे अनेक नियम शास्त्रात सांगितले आहेत. याकाळात यमाचे भय वाटते त्यामुळे झोपणे, खाणेपिणे, प्रवास, पैशांची देवाण-घेवाण तर करत नाहीतच, परंतु मुखातून निघालेल्या शब्दांना सत्यता लाभण्याची एक प्रकारची धास्ती असल्यामुळे की काय शपथ घेऊ नये, अभद्र बोलू नये, हिंसा टाळावी अशी संध्याकाळची अनेक पथ्ये सांगितली आहेत. लहान बाळाला तिन्हीसांजेला बाहेर न काढता मांडीवर घेऊन बसावे. तरुण मुलींनी पाणवठय़ावर जाऊ नये, नववधूने घरचा उंबरा ओलांडू नये कारण संध्याकालामध्ये वाईट शक्तींचा प्रभाव जास्त असतो. भुतेखेते हे त्यांचे वास्तव्य असलेल्या भुवर्लोकातून संध्याकाळी थेट भूलोकावर येतात. त्यांना त्यावेळी पृथ्वीवर फिरण्याची मुभा असते. अशावेळी त्यांच्या मार्गात कोणी आडवा आला तर त्याला पिशाच्चाची बाधा होते. माणसाच्या शरीरात क्षुद्र देवता व पिशाच्च देवता यांचा प्रवेश केसांमधून होतो म्हणून स्त्रियांनी तिन्हीसांजेला केस मोकळे सोडून बाहेर जाऊ नये असा नियम आहे. बायकांनी वेणी घालावी आणि पुरुषांनी शेंडीला गाठ मारावी अशी प्राचीन काळी सक्त रुढी होती. मोकळय़ा केसांमधून भुतांना सहज माणसाच्या शरीरात शिरकाव करता येतो.
सुमाळी हा दैत्य पाताळावर राज्य करीत होता. एकदा तो अचानक पृथ्वीची सैर करायला आला. त्याने सुवर्णाची लंका बघितली आणि तिचा त्याला मोह पडला. मग त्याने एका गरीब ब्राह्मणाचे रूप घेऊन मुलगी कैकसीसह तो विश्रव्याकडे आला. ते महान ऋषी होते. त्यांनी आपल्या मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार करावा अशी त्याने त्यांना विनंती केली. विश्रव्यानी कैकसीशी विवाह केला. एक दिवस संध्याकाळी ते अग्निहोत्र करत असताना तिने त्यांना भोग मागितला. सायंकाळी पत्नीची कामेच्छा विश्रव्यांनी पुरी केली आणि कैकसीपोटी दैत्य संतती निपजली. रावण हा महाभयंकर राक्षस कैकसीच्या उदरी जन्माला आला तेव्हा उत्पात झाले, अपशकून झाले. संध्याकाळी भोग घेतल्याने अनाचारी संतती निर्माण होते. संध्याकाळी परमेश्वराचे नामस्मरण करावे. दीप लावावा. पूजनीय डोंगरे महाराज म्हणतात, जिच्या घरात एकच पणती आहे अशी गृहलक्ष्मी पूर्वीच्या काळी दाराच्या उंबऱयात दिवा लावत असे. जेणेकरून थोडा प्रकाश बाहेर आणि थोडा घरात पडत असे. आपण जिभेवर श्रीराम नामाचा दीप लावावा जेणेकरून त्याचा प्रकाश आतबाहेर पडेल आणि माणसाच्या अंतःकरणात आणि वातावरणात श्रीराम नामाचा उजेड पडेल. संध्याकाळी घरात उजेड असायला हवा. नाही तर वाईट शक्तींचा प्रभाव वाढतो. देवापाशी, तुळशीपाशी, अंगणात दिवा लावावा. ही अग्निपूजा आहे. शक्मयतो साजूक तुपाचा दिवा लावावा असे ऋषींचे सांगणे आहे. धूपदीप, अगरबत्ती लावून संध्याकाळी मोठय़ा आवाजात मंगल स्वरात स्तोत्रे म्हटल्याने मन तर प्रसन्न होतेच, शिवाय ही अग्नीची आराधना आहे.
हिरण्यकश्यपूसारख्या दैत्याचा नाश करण्यासाठी विष्णूंनी अवतार घेतला तो नरसिंह रूपात. देह नराचा आणि मुख सिंहाचे असलेला नृसिंह दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी संध्याकाळी स्तंभातून प्रगटला. देवाची अनन्य भक्ती करणाऱया भक्त प्रल्हादाचे विष्णूंनी रक्षण केले. हे एक अग्निनारायणाचे रूप आहे. नामस्मरण म्हणजे आत्मस्वरूप असलेल्या अग्नीची आराधना आहे. तिन्हीसांजेला लक्ष्मी घरात येते. ओवी गाणारी स्त्री म्हणते, ‘तिन्ही सांजा झाल्या, दिव्यांची जलदी करा, लक्ष्मी आली घरा, मोत्यांनी ओटी भरा.’ सांजवेळ आणि वाट बघणे, येरझारा घालणे यांचे अतूट असे नाते आहे. पाखरे घरी परतण्याची ही वेळ. घराबाहेर गेलेली मुले, माणसे, गुरेही घरच्या ओढीने सायंकाळी परत येतात. पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात, ‘जगदंबेने दैव ही शिदोरी बरोबर देऊन जगाच्या पाठशाळेत आपल्याला पाठवले आहे. आपली शाळा सुटण्याची वेळ झाली म्हणजे आयुष्याच्या सांजवेळी मरण समयी ती जगदंबा देवाच्या घरी वाट बघत उभी असते. येरझारा घालीत असते. जगाच्या शाळेत आपण पास झालो की नापास याची ती आतुरतेने वाट बघत असते. तेव्हा आपण आपले प्रगतीपुस्तक पहिल्या नंबरने पास केलेले असावे अशी तिची अपेक्षा असते.’
सामान्य माणसाचे नेत्र पैलतिरी लागले की संध्याछाया त्याला भिववू लागतात. याउलट संतांची मनःस्थिती असते. संत तुकाराम महाराज कुणाची बरे वाट बघतात? ‘बघता वाटुली, सिणले डोळुले अशी अवस्था अनुभवताना’ तुका म्हणे धन्य ऐसा दिवस तो कोणा । पंढरीचे वाटे येता मूळ देखेन’।। पंढरीहून माझे मायबाप मला नेण्यासाठी येतील तो दिवस धन्य होय. संध्याकाळ सुंदर असते, फक्त आपले मन प्रसन्न हवे.
– स्नेहा शिनखेडे