मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवा अन्यथा आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
ऊसदरासाठी शेतकऱयांनी गेल्या काही दिवसांपासून तीव्र आंदोलन सुरू केले आहे. प्रतिटन किमान 3 हजार 500 रुपये दर द्या, त्यामध्ये कोणत्याही प्रकारे रक्कम कमी करू नये. पूर्ण रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. त्यासाठी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार बैठक झाली. मात्र कोणताही तोडगा निघला नाही. त्यामुळे शेतकऱयांनी शुक्रवारी पुन्हा आंदोलनाला सुरुवात केली आहे. शनिवारीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत.
शुक्रवारी सुवर्णसौधसमोर आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱयांना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे शेतकरी पुन्हा भडकले आहेत. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे. मात्र पोलिसांनी आम्हाला अटक केली. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही ठाण मांडून बसणार आहे, असे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शेतकऱयांबरोबर चर्चा केली. किमान आठवडय़ाचा वेळ द्या, अशी विनंती त्यांनी केली. ऊसदर हा केवळ बेळगावचाच नाही तर संपूर्ण राज्याचा प्रश्न येतो. त्यामुळे सरकार पातळीवर त्याची चर्चा झाली पाहिजे. त्यानंतरच त्यावर तोडगा निघू शकतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शेतकऱयांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करायची आहे. रविवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई हे कित्तूर उत्सवाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. त्यांनी जर तोडगा काढला नाही तर त्यांना आम्ही विरोध दर्शवू, असे सांगितले. आम्हाला हे करायचे नाही. मात्र आमचा नाईलाज आहे. कारण आम्हाला सरकारने आजपर्यंत काहीच दिले नाही. महागाई पाच पटीने वाढली आहे. मात्र ऊसदर जैसे थे आहे. बेंगळूर येथे जी बैठक झाली त्यामध्ये कोणताच निर्णय झाला नाही. शेतकऱयांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. यामुळे शेतकऱयांनी एफआरपीचा दर मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे यावेळी शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी चुन्नाप्पा पुजेरी, रवी सिध्दमण्णावर, राघवेंद्र नाईक, शिवानंद उळागड्डी यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.