अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार, 30 जुलै 2021, सकाळी 10.30
● जिल्ह्यात वाढले नव्याने 864 रूग्ण ● कराड तालुक्यात नवे हॉटस्पॉट वाढताहेत ● जिल्ह्यात 24 तासात 10167 चाचण्या ● पॉझिटिव्हीटी रेट 8.5 वर ● शहरी भागात गर्दीला आवरावे लागेल
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ कमी-जास्त होत आहे. गेल्या आठवडाभरात लॉकडाऊन शिथिल झाल्याने शहरी बाजारपेठांमधे प्रचंड गर्दी वाढली आहे. यात हा आठवडा जिल्ह्यासाठी अत्यंत धक्कादायक घटनांचा ठरला. अतिवृष्टीने पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, ढोकवळेत भूस्खलन होऊन मृत्यूचे तांडव झाले. कोरोनाचा विळखा कसाबसा सुटत असतानाच ही आपत्ती आल्याने प्रशासनावरील ताण चांगलाच वाढला. कोरोना रूग्णसंख्या कमी करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू असतानाच पॉझिटिव्हीटी रेट आणखी वाढला आहे. यातच आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल यायला तीन दिवस ते आठ दिवसांचा कालावधी लागत असल्याच्या तक्रारी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. दरम्यान शुक्रवारी आलेल्या अहवालात जिल्ह्यात 864 नव्या रूग्णांची वाढ झाली असून पॉझिटिव्हीटी रेट 8.5 वर आहे.
सार्वजनिक ठिकाणची गर्दी आवरावी लागेल
जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून शहरी भागातील बाजारपेठांमधे प्रचंड गर्दी वाढली आहे. गर्दीत कोरोना प्रतिबंधक विभागाच्या नियमांचे पालन अनेक लोक करताना दिसत नाहीत. परिणामी रूग्णवाढीचा आकडा कधी हजारी पार करतोय तर कधी 800 वर स्थिर होतोय. त्यामुळे आता प्रशासनाने कडक कारवाईचा बडगा उगारत नाहक गर्दीला नियंत्रणात ठेवावे लागेल.
आज जिल्हा आपत्ती प्राधिकरणची बैठक
जिल्ह्यात आज आपत्ती प्राधिकरणची बैठक होणार आहे. गेल्या आठवड्याभरात नेमकी कोरोना रूग्णवाढीचा स्थिती काय आहे यावर चर्चा होईल. त्यानंतर जिल्ह्यातील निर्बंधांवर, नियम न पाळणारांवर कारवाई करण्याबाबत सुचना दिली जाण्याची शक्यता आहेत. दरम्यान आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल उशीरा का येत आहेत यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल वेळेत आल्यास संभाव्य रूग्णांच्या उपचाराला वेळेत सुरूवात होईल. त्यामुळे यावर नियोजन होण्याची गरज आहे.
गुरूवारपर्यंत जिल्ह्यात एकूण नमूने – 13,87,108, एकूण बाधित –2,18,110 घरी सोडण्यात आलेले – 2,03,294 मृत्यू -5240 उपचारार्थ रुग्ण-11393
गुरूवारी जिल्हय़ात बाधित 864, मुक्त 756, बळी 11