ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शेजारील देशांमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. कोणताही प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तत्काळ क्वारंटाईन केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी दिली.
देशातील कोरोना आढावा घेण्यासाठी तीन उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या. व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या बैठकीत सर्व राज्यांचे आरोग्यमंत्री उपस्थित होते. बैठकीतून विविध राज्यातील कोरोना स्थितीचा आरोग्यमंत्र्यांनी आढावा घेतला. कोरोनाची संभाव्य लाट रोखण्यासाठी सर्वच पातळीवर सतर्क राहण्याचा सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. कोरोना तपासण्यांचे प्रमाण वाढवण्यासह रुग्णालयातील पायाभूत सुविधांना अधिक बळकट करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. केंद्र तसेच राज्यांना एकत्रित काम करण्याच्या आवश्यकतेवर आरोग्यमंत्र्यांनी बैठकीत भर दिला.
अधिक वाचा : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढे ढकलला; काय आहे कारण?