ऑनलाईन टीम/तरुण भारत
मोदी सरकारकडून मंगळवारी अग्निपथ योजनेची (agneepath scheme) घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत अनेक युवकांना सैन्य दलात काम करण्याची संधी मिळणार आहे. पण अग्निपथ योजनेची घोषणा करून एक दिवस झाल्यांनतर या योजनेला आता विरोध होताना दिसत आहे. योजनेच्या निषेधार्थ बिहारच्या (Bihar) बक्सरमध्ये तरुणांनी ट्रेनवर दगडफेक केली. तर मुझफ्फरपूरमध्ये तरुणांनी रस्त्यावर उतरत गोंधळ घातला. याशिवाय अनेक ठिकाणी रस्ते रोखण्यात आले.
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला आता विद्यार्थी विरोध करत आहेत. बिहारमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. सकाळी ९ च्या सुमारास तरुण मोठ्या संख्येनं युवक बक्सर रेल्वे स्थानकात पोहोचले. यावेळी युवकांनी रेल्वे रुळांवर ठिय्या दिला. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे जनशताब्दी एक्स्प्रेस जवळपास एक तासभर पुढे सरकू लागली. यावेळी काही तरुणांनी पाटण्याला जात असलेल्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसवर दगडफेक केली. सध्या आरपीएफकडून रेल्वे रुळ मोकळे करण्याचं काम सुरू आहे. जीआरपी घटनास्थळी कार्यरत आहे. केंद्र सरकारच्या योजनेमुळे ४ वर्षे आम्हाला काम मिळेल. मात्र त्यानंतर आम्ही काय करायचं, असा प्रश्न तरुणांनी उपस्थित केला.
अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भरती होणारे तरुण ४ वर्षे अग्निवीर म्हणून सेवा देतील. यातील २५ टक्के अग्निवीरांना पुढे संधी दिली जाईल. पण मग उरलेल्या ७५ टक्के तरुणांचं काय? ४ वर्षांनंतर त्यांच्याकडे कोणते पर्याय असतील? भले सरकार त्यांना जवळपास १२ लाख रुपये देणार असेल. पण त्यांना दुसरी नोकरी देण्यासाठी सरकारकडे कोणती योजना आहे?, असे प्रश्न तरुणांनी विचारले.