गणेशपूर, क्रांतीनगर परिसरातील स्मशानभूमीबाबत तक्रारी :समस्या सोडविण्याकडे अधिकाऱयांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशपूर, क्रांतीनगर परिसरातील स्मशानभूमीबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत आहेत. स्मशानभूमीच्या विकासाकडे आणि येथील समस्यांचे निवारण करण्याकडे ग्रामपंचायतीने कानाडोळा केला आहे. तर समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करून ग्रामपंचायतचे सदस्य व विकास अधिकारी उद्धट उत्तरे देत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
गणेशपूर, महालक्ष्मीनगर, सरस्वतीनगर, पार्वती लेआउट, क्रांतीनगर, ज्योतीनगर, हिरोजी मळा अशा विविध परिसरातील नागरिकांसाठी क्रांतीनगर येथील स्मशानभूमी सोयीची ठरते. मात्र स्मशानभूमीकडे जाण्याचा रस्ता खराब झाला असून झाडे झुडपे वाढली आहेत. पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आवश्यक दिव्यांची व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी अंत्यविधी करताना अंधाराचा सामना करावा लागतो.
पावसाळय़ात रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत जाणेदेखील मुश्कील बनते. गुडघाभर चिखलामधून अंत्यविधी करिता नागरिकांना कसरत करीत जावे लागते. येथील समस्यांचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायतकडे सातत्याने करण्यात आली आहे. पण त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. तरीदेखील ग्रामपंचायतच्या विकास अधिकाऱयांनी आणि अध्यक्ष, सदस्यांनी दुर्लक्ष केले आहे.
विकास अधिकाऱयांवर कारवाई करा
समस्यांचे निवारण करा, अशी विनंती करणाऱया नागरिकांना उद्धट उत्तरे देत आहेत. वृत्तपत्रातून बातमी प्रसिद्ध केली असून ज्यांनी बातमी दिली त्यांच्याकडूनच विकास कामे करून घ्या, असे उत्तर काही ग्रामपंचायत सदस्यांसह, विकास अधिकारी देत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. स्मशाभूमीत गवत वाढले असून साप-किडय़ांचा वावर वाढला आहे. कोणताही अनर्थ घडल्यास त्याला विकास अधिकारी व सदस्य जबाबदार राहतील, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱया विकास अधिकाऱयांवर कारवाई करावी. ग्रामपंचायत बरखास्त करावी, अशी मागणी होत आहे.