कॅन्टोन्मेंट परिसरात अंधार, तक्रारीची दखल घेण्याकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
कॅम्पमधील बहुतांश पथदीप बंद असून येथील गवळी गल्ली स्वच्छतागृह परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याबाबत कॅन्टोन्मेंट कार्यालयात तक्रार नोंदविण्यास गेले असता, तक्रार नोंदवून घेतली जात नाही. दुरुस्ती करणारे कर्मचारी देखील कानाडोळा करीत असल्याने याबाबत तक्रार कुणाकडे करायची, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
कॅन्टोन्मेट बोर्डच्या अधिकाऱयांच्या मनमानी कारभाराचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. कॅम्पमधील काही रस्त्यावरील पथदीप बंद असल्याने अंधार पसरला आहे. येथील समस्यांकडे कॅन्टोन्मेट बोर्डच्या अधिकाऱयांनी साफ दुर्लक्ष केले आहे.
गवळी गल्लीतील सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळील पथदीप बंद असल्याने नागरिकांना अडचण निर्माण झाली आहे. याठिकाणी ड्रेनेजकरिता खोदाई करण्यात आली असल्याने रस्ता व्यवस्थित नाही, अशातच पथदीप बंद असल्याने अपघात होण्याची शक्मयता आहे. याबाबत कार्यालयात तक्रार नोंदवून घेतली जात नाही. तर कॅन्टोन्मेंटच्या लाईनमनकडे तक्रार केली असता, मला सांगू नका, कॅन्टोन्मेंटने नवीन लाईनमन घेतला आहे. त्याच्याकडे तक्रार करा अशी उद्धट उत्तरे देत आहे. त्यामुळे तक्रार कुणाकडे करायची, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
तसेच वनिता विद्यालय ते युनियन जिमखाना परिसर कॅन्टोन्मेट हद्दीमध्ये येतो. पण हा रस्ता शहराचे प्रवेशद्वार असल्याने नागरिकांची रोज रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. पण येथील पथदीप रात्रीच्यावेळी बंद ठेवण्यात येत असल्याने नागरिकांना अंधारामध्ये ये-जा करावी लागत आहे.
काही ठिकाणचे हायमास्ट दिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. आता पूर्णपणे बंद ठेवण्यात आले असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत असून पथदिपांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.