68 लाख लोक झाले बेघर ः भारतावरही युद्धाचा प्रभाव
@ वृत्तसंस्था / कीव्ह
रशियाने युक्रेनवर 24 फेब्रुवारी रोजी आक्रमण केले होते. तेव्हापासून 100 दिवस झाले तरीही हा भीषण संघर्ष सुरू आहे. नाटोच्या सदस्यत्वावरून रशिया-युक्रेनमधील तणावाने हजारो लोकांचा बळी घेतला आहे. मागील 100 दिवसांमध्ये युक्रेनचे पूर्ण चित्रच बदलले आहे. कधीकाळी झगमगून निघणारी युक्रेनमधील शहरे आता उद्ध्वस्त झाली आहेत.
रशिया-युक्रेन युद्धाने पूर्व युरोपबाहेरील अन्य देशांनाही संकटात आणले आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनच्या 68 लाख लोकांना पलायन करावे लागले. हे प्रमाण युक्रेनच्या लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे 15 टक्के इतके आहे. या 68 लाख लोकांपैकी सुमारे 36 लाख लोक पोलंडमध्ये पोहोचले आहेत. यामुळे पोलंडच्या लोकसंख्येत 10 टक्क्यांची भर पडली आहे.
2021 मध्ये युक्रेनची लोकसंख्या 4.3 कोटी होती. ती आता कमी होत 3.7 कोटींवर आली आहे. दुसरीकडे 80 लाख लोक युक्रेनमध्ये अंतर्गत स्वरुपात विस्थापित झाले आहेत. यामुळे एक मोठे मानवी संकट उभे ठाकले आहे. युक्रेनमध्ये प्रत्येक सेकंदाला एक मूल युद्ध शरणार्थी होत आहे.
रशियाची कोंडी करण्यासाठी पाश्चिमात्य देश सातत्याने त्याच्यावरील निर्बंधांचा विळखा अधिक घट्ट करत आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून रशियावर 5,831 निर्बंध लादण्यात आले आहेत. यातील सर्वाधिक 1,144 निर्बंध अमेरिकेने लादले आहेत. याचबरोबर 4,800 हून अधिक रशियन नागरिकांवर बंदी घालण्यात आली आहे. तर 562 संस्था आणि 458 कंपन्यांना निर्बंधांच्या कक्षेत ठेवण्यात आले आहे.
भारतालाही फटका
युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून तीन महिन्यांमध्ये फॉरेन पोर्टफोलियो इन्व्हेस्टर्सनी भारतीय भांडवल बाजारातून 1 लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत. तर यापूर्वीच्या 9 महिन्यांमध्ये एकूण 50 हजार कोटी रुपयेच काढून घेण्यात आले होते. भारतासह जगभरातील बाजारपेठांना महागाईचा फटका बसत आहे. या युद्धामुळे रुपयामध्ये डॉलरच्या तुलनेत मोठी घसरण झाली आहे. 23 फेब्रुवारी रोजी एका डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 74.6 इतके होते. तर 31 मे रोजी हे मूल्य 77.7 रुपयांपर्यंत घसरले आहे. तर चालू वर्षाच्या प्रारंभी कच्च्या तेलाची किंमत 80 डॉलर्स प्रतिबॅरल इतकी होती. रशियाच्या हल्ल्यानंतर ही किंमत 128 डॉलर्स प्रतिबॅरलपर्यंत पोहोचली आहे.