प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यातील सुमारे 30 हजार लोकांना वृद्धाप पेन्शनसाठी अर्ज न करता या योजनेत सहभागी करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या सु-मोटूच्या माध्यमातून आधारकार्डच्या साहाय्याने वृद्ध व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना पेन्शन लागू करण्यात आली आहे. यामुळे वृद्ध व्यक्तींचे परिश्रम वाचले आहेत.
ही योजना फेब्रुवारी 2021 मध्ये सुरू करण्यात आली होती. 28 हजार 848 व्यक्तींना वृद्धाप पेन्शन मंजूर करण्यात आली होती. उडुपी व मगादी या दोन तालुक्मयांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात आली होती. देशात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात आला आहे. अनेक वयोवृद्ध महिला तसेच व्यक्तींना यामुळे फायदा झाला आहे.
बीपीएल कार्डधारक वृद्ध व्यक्तींना राज्य सरकारच्यावतीने पेन्शन दिली जाते. 64 व 65 वर्षाच्या व्यक्तींना 600 रुपये तर 65 वर्षांवरील व्यक्तींना इंदिरा गांधी वृद्धाप पेन्शन व संध्या सुरक्षा योजनेंतर्गत 1000 ते 1200 रुपये जमा केले जातात. राज्यभरात 58 लाखहून अधिक वयोवृद्ध पेन्शन घेतात.
ई-गव्हर्नन्स विभागाच्या साहाय्याने बीपीएल कार्डधारक व त्यांचे आधारकार्ड लिंक करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व माहिती सरकारकडे उपलब्ध झाली आहे. 60 वर्ष ओलांडल्यानंतर संबंधित व्यक्तीची माहिती ग्राम पंचायत तसेच स्थानिक प्रशासनाकडे वर्ग केली जाणार आहे. अधिकारी संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन कागदपत्रांची तपासणी करणार आहेत. यामुळे नागरिकांना पेन्शनसाठी अर्ज करणे सोयीचे ठरणार आहे.