पद्म पुरस्कारांची घोषणा, सुधा मूर्तींसह लेखक-विचारवंत एस. एल. भैराप्पा यांना पद्मभूषण
6 जणांना पद्मविभूषण, 9 पद्मभूषण, तर 91 मान्यवरांना पद्मश्री
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा सहा मान्यवरांना पद्मविभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला असून त्यात, दिवंगत नेते मुलायमसिंग यादव यांचा समावेश आहे. कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा, प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन आणि रुग्णांच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन सिस्टिमचे संशोधन दिलीप महालनबीस यांचा पद्मविभूषण मानकऱयांमध्ये समावेश आहे. कर्नाटकातील सुप्रसिद्ध लेखक आणि विचारवंत एस. एल. भैराप्पा यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले असून त्यांच्यासह आणखी 8 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. 91 मान्यवर पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. सर्वांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार आहेत. इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायणमूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात येण्याची घोषणा करण्यात आली आहे.
पद्म पुरस्कार हे देशातील महत्त्वाचे नागरी पुरस्कार समजले जातात. अप्रसिद्ध पण विविध क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी करणाऱयांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याची पद्धती 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने प्रारंभ केली होती. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्येही अशा अनेक व्यक्तींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सर्वपरिचित राजकीय नेते, कलाकार, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश विजेत्यांमध्ये करण्यात आला आहे. पश्चिम बंगालचे दिवंगत दिलीप महालनबीस यांना घोषित करण्यात आलेला पद्मविभूषण पुरस्कार या प्रथेचे द्योतक मानण्यात येत आहे. महालनबीस यांनी संशोधित केलेल्या आणि जगभरातील कोटय़वधी रुग्णांना जीवनदान देण्यासाठी कारणीभूत असणाऱया ऑनलाईन रजिस्ट्रेशन सिस्टिमचा प्रारंभ त्यांनी केला होता. गेल्या ऑक्टोबरमध्येच त्यांचे निधन झाले होते. त्यांना मरणोपरांत हा पुरस्कार देण्यात येत आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांनाही हा पुरस्कार मरणोपरांत देण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली.
वैज्ञानिकांचाही गौरव
अमेरिकेत वास्तव्य असणारे श्रीनिवास वराधन यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. तर उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील विख्यात कुमारमंगलम बिर्ला यांना पद्मभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेल्या दीपक धार या महाराष्ट्रातील संशोधकांना पद्मभूषण देण्यात आले आहे. कला क्षेत्रातील विख्यात नाव वाणी जयराम यांनाही पद्मभूषण पुरस्कार दिला जाणार आहे. अध्यात्म क्षेत्रात सुप्रसिद्ध असणाऱया स्वामी चिन्ना जीयार हे पद्मभूषणचे मानकरी ठरले असून प्रख्यात भावगीत गायिका सुमन कल्याणपूर यांनाही याच पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.