पुणे / प्रतिनिधी :
राज्यकर्त्यांना सर्वांत जास्त भीती डोक्यांची वाटते. जिकडे जास्त डोकी, त्या बाजूने जास्त राज्यकर्ते बोलतात. कारण राज्यकर्ते ही एक रेड्याची अवलाद आहे. राज्यकर्त्यांना बोलायला लावायचे असेल, तर आपल्याला ज्ञानेश्वरांसारखा त्या रेड्याच्या पाठीवर हात ठेवावा लागेल, असे विधान माजी आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केले.
‘वास्तव कट्टा’ आणि ‘अर्हम फाऊंडेशन’ यांच्या वतीने स्पर्धा परीक्षार्थींसह संवाद कार्यक्रमात खोत बोलत होते. माजी मंत्री आमदार बच्चू कडू, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार निरंजन डावखरे, अभिमन्यू पवार या वेळी उपस्थित होते.
खोत म्हणाले, दरवर्षी राज्यव्यापी विद्यार्थी अधिवेशन आयोजित केले पाहिजे. त्याचा फायदा होईल. राज्यकर्त्यांना बोलायला लावायचे असेल, तर आपल्याला ज्ञानेश्वरांसारखे त्या रेड्याच्या पाठीवर हात ठेवावा लागेल. कारण त्यांच्या पाठीवर हात ठेवल्याशिवाय ते वेद बोलत नाहीत. तसेच त्यांना डोकी जास्त दिसली. तर ते आपोआप तुम्हाला नको असलेलेही बोलून जातात, अशी टिप्पणी त्यांनी केली.
कडू म्हणाले, सरकार कोणाचेही असले तरी भ्रष्टाचार प्रचंड आहे. पैसे देणारा तरुण पुढे जातो आणि अभ्यास करणारा तरुण मागे राहतो. भ्रष्टाचार कसा संपेल याकडे लक्ष दिले पाहिजे. आज बेरोजगारीशिवाय दुसरा प्रश्न काय आहे? बेरोजगारी हा सरकारच्या अजेंड्यावरचा विषय असला पाहिजे. सदाभाऊ राजकीय नेत्यांना रेडे म्हणाले, तरी हे रेडे लोकहिताचे असले पाहिजेत. लोकांबाबत मनात आस्था नसेल, तर अशा कितीही शक्ती एकत्र येऊन काही होणार नाही, असा टोलाही कडू यांनी शिवसेनेला लगावला. मंत्रिमंडळ विस्तार माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. आता वंचितांचा विस्तार झाला पाहिजे. विस्तार कधी होणार, हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना विचारले पाहिजे. तेच त्याबाबत सांगतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यपालांनी स्पष्टीकरण देणे महत्त्वाचे
संजय राऊत यांचे म्हणणे काही अंशी खरे आहे. मी त्यांच्या बाजूने आहे. कुठल्याही महापुरुषाबद्दल अशा प्रकारे बोलणे उचित नाही. राज्यपालांनी यावर स्पष्टीकरण देणे महत्त्वाचे आहे. सगळे प्रश्न कारवाईने सुटत नाही, असेही कडू म्हणाले.