सांगली: शरद पवारांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्य़ांची चेष्टा केली आहे. आज महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे. यावर्षी शेतकऱ्यांना हर्बल तंबाखु पेरण्याची परवानगी द्या अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर सदाभाऊ खोत यांनी जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदार निधीतून आटपाडी तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी सदाभाऊ खोत बोलत होते.
बारामतीचा गडी एवढा हुशार कसा?
बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत? हे मी वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे, असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
सदाभाऊ खोत हे आपल्या रांगड्या स्वभावासाठी आणि भाषणाच्या हटके स्टाइलसाठी ओळखले जातात. सांगली येथे मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमातही सदाभाऊ खोत यांचं हेच रूप पाहायला मिळालं. खोत यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीक करत चौफेर फटकेबाजी केली.
महाराष्ट्रात सगळा पेरा तंबाखूचा करू
शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, विजेचा, ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अवकाळी, वादळी पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. या प्रश्नाकडे लक्ष द्यायला नेत्यांना वेळ नाही. मंत्री नवाब मलिक यांच्याकडे गांजा सापडला तेव्हा तो हर्बल तंबाखू आहे असं म्हटलं गेलं. आता सरकारने त्या हर्बल तंबाखूच्या बिया द्याव्यात आम्ही महाराष्ट्रात सगळा पेरा तंबाखूचा करतो. यानिमित्ताने गरीबी हटेल. हे सरकार शेतकऱ्याला काही देऊ शकत नाहीत. याउलट सरकारच्या विरोधात जो कोण बोलेल त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली जाते असे म्हणत महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
मुख्यमंत्र्यांना पद सांभाळता येत नाही
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, हे राज्यसरकार जनतेला लुटण्यासाठी चालवले जात आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही कळत नाही. संभाजीनगरचे नामकरण करण्यावरून मुख्यमंत्र्यांवर खोतांनी टोला लगावला. मुख्यमंत्र्यांना पद सांभाळता येत नसल्यानं पुन्हा देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्री करायचं असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी आवाहन केलं आहे.
मी पुन्हा येईन हे वाक्य खरं करायचंय
पुढे ते म्हणाले, काहीजण मला म्हणतात तुम्ही गोपीचंद पडळकर यांच्या नादाला कसे लागलात. यावर उत्तर देताना ते म्हणाले, पडळकर आणि मी पागल आहोत. पागल माणसाच क्रांती घडवून आणतात. शहाणी माणसं अभ्यास करतात. पडळरांबरोबर महाराष्ट्रातील जनता आहे.आम्हाला क्रांती करायची आहे. मी पुन्हा येईन हे वाक्य खरं करायच आहे असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शरद पवार राजकारणातला बिलंदर माणूस; सदाभाऊ खोतांचा खोचक टोला
Advertisements