ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विधानपरिषद निवडणुकीतील चूरस आता वाढली आहे. भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आज शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला. मात्र, काँगेसने आपला उमेदवार मागे घेतला नाही. त्यामुळे बिनविरोधचे प्रयत्न फसले असून, आता 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असतील.
विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने काँग्रेसवर एक उमेदवार मागे घेण्यासाठी दबाव टाकला होता. मात्र काँग्रेसनं आपला दुसरा उमेदवारही कायम ठेवला. त्यामुळे आता 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. यात भाजपचे 5 तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसनेचे प्रत्येकी 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड तर शिवसेनेकडून सचिन अहिर, आमशा पाडवी, राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे आणि काँग्रेसकडून भाई जगताप व चंद्रकांत हंडोरे हे उमेदवार रिंगणात आहेत.
दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा होती. पण महाविकास आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. काँग्रेसने दुसरा उमेदवार माघारी न घेतल्याने ही निवडणूक होत आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपकडे सध्या 106 संख्याबळ आहे. विधानपरिषदेत प्रत्येक आमदाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 27 मते आवश्यक आहेत. या गणितानुसार भाजपचे पहिले 4 उमेदवार निवडून येतील. तर पाचव्या जागेवरील प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी भाजपला मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.