सदाभाऊ खोत यांचे राजू शेट्टींना प्रत्युत्तर : सांगोल्यातील प्रकारचा राष्ट्रवादीकडूनच कट रचल्याचा केला आरोप
प्रतिनिधी/कोल्हापूर
हॉटेलच्या बिलासाठी अडवणुक करणारा कार्यकर्ता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा होता, असे राजू शेट्टी सांगत असतील तर त्याच्या छातीवर स्वाभिमानीचा बिल्ला का दिसला नाही. स्वाभिमानीचा बिल्ला राष्ट्रवादीच्या वळचणीला बांधून ठेवलांय काय हे तरी स्पष्ट करावे असे प्रत्युत्तर रायत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना दिले. तसेच हा कट राष्ट्रवादीकडून केला गेला असल्याचा आरोपही खोत यांनी केला.
रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांची अडवणुक करणारा कार्यकर्ता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा असल्याचे वक्तव्य माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याला सदाभाऊ खोत यांनी कोल्हापुरमधून प्रत्यूत्तर दिले. याप्रसंगी ते बोलत होते.
सदाभाऊ खोत म्हणाले, माझी अडवणुक करणारा कार्यकर्ता फसवणुक, दरोडय़ाचे गुन्हे दाखल असलेल्यांचा असेल तर जनता याचा नक्कीच विचार करेल. तो स्वाभिमानीचा कार्यकर्ता असेल तर त्याच्या छातीवर स्वाभिमानीचा बिल्ला का दिसला नाही. स्वाभिमानीचा बिल्ला यांनी राष्ट्रवादीच्या वळचणीला बांधून ठेवला आहे काय हे शेट्टी यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान खोत यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले, सांगोला येथे जो काही प्रकार घडला तो राष्ट्रवादीकडून पुर्वनियोजीत होता. पुढे आलेला व्यक्ती हा गुन्हेगार प्रवृत्तीचा होता. हॉटेलच बिल दिले नाही तर मग आठ वर्ष संबंधित व्यक्ती गप्प का बसली, आत्ताच त्याला बिलाची आठवण कोठून झाली, असा प्रश्न खोत यांनी उपस्थित केला. तसेच निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी शिळी भाकरी खाऊन प्रचार केला. संबंधित हॉटेल मालकाला जेवण कोण जेवले याची विचारणा केली असता त्याला उत्तर देता आले नाही. या गावची त्या गावची माणसे जेवून गेल्याचे तो सांगत आहे. निवडणुकी दरम्यान गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पैसे नव्हते, मग जेवणावळी कोठून घालणार. आम्ही काय गावजेवण घालत सुटलो नसल्याचे यावेळी खोत यांनी स्पष्ट केले.
गृहराज्यमंत्र्यांशी पत्र व्यवहार
सांगोला येथील प्रकारानंतर सदाभाऊ खोत यांना सशस्त्र बंदोबस्त देण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना खोत म्हणाले, संरक्षण देण्याची मागणी केली नाही. घरावर तुळशी पत्र ठेवून आम्ही चळवळीत उतरलो आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील आमची लढाई आहे. यापुर्वीही आंदोलनादरम्यान मारझोड, गुन्हे दाखल होणे असे प्रकार घडले आहेत. तुम्ही जर आमच्या जीवाशी खेळणार असाल आणि यामधून काही बर वाईट घडल्यास याला सर्वस्वी राष्ट्रवादी जबाबदार असणार असा पत्रव्यवहार गृहराज्यमंत्र्यांशी करणार असल्याचे खोत यांनी सांगितले.
पोलिसांची तडजोडीची भुमिका
या षडयंत्रामागे एक बडा नेता असल्याने अडवणुक करण्यासाठी पुढे आलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करायल पोलीस टाळाटाळ करत होते. याकाळातील पोलीस ठाण्यातील, पोलीसांची कॉल डिटेल्स तपासले तर यावरुन तो नेता कोण होता हे स्पष्ट होईल. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी ठाण मांडल्यानंतरही पोलीसांकडून तडजोड करण्याची भुमिका घेतली जात होती. यावरुन पोलिसांवर किती दबाव होता हे दिसून आले, असेही खोत म्हणाले.
राष्ट्रवादीकडूनच पुर्वनियोजित कट
अडवणुक करणाऱया व्यक्तीला आपण यापुर्वी कधीही पाहिले नाही. आठ वर्षानतंर या व्यक्तीला बिलाची आठवण कशी झाली. हॉटेलचे बिल मागताना प्रसार माध्यमांना सोबत आणण्याचे कारण काय, यावरुन हा राष्ट्रवादीचा पुर्वनियोजित कट असल्याचे सदाभाऊ खोत यांनी यावेळी सांगितले.