अध्याय तेविसावा
भगवंत उद्धवाला मनाचे महात्म्य समजाऊन सांगत होते. ते म्हणाले, मन ताब्यात आलं तरंच इतर इंद्रिये वश होतात. इंद्रिये मात्र मनाला ताब्यात ठेऊ शकत नाहीत. कारण मनाला वश करणे हे त्यांच्या कुवतीच्या बाहेरचे आहे. मन हे बलवानांपेक्षाही बलवान आहे. जो मनावर नियंत्रण मिळवतो, तो देवांचाही देव होतो. मनाने सर्वांना आपल्या आधीन केलेले आहे परंतु मन मात्र कोणालाच आवरत नाही. मनाने देवांनाही छळले आहे, ते इंद्रियांना कसे आवरणार? कारण इंद्रियेच मुळी मनाच्या आधीन असतात. जेव्हा इंद्रिये स्वाधीन ठेवून मनच एखाद्या विषयात एकाग्र होते, तेव्हा त्या ठिकाणी इतर इंद्रियांचे सामर्थ्य खरोखर निष्फळ होऊन राहते. भगवंतांचे सांगणे समजण्यासाठी व्यवहारातील एक उदाहरण देतो. समजा आपण एखादी विशिष्ट पण दुर्मिळ वस्तू आणायला बाजारात गेलो आहोत. साहजिकच आपलं सगळं लक्ष ती वस्तू कुठं दिसतीये का, इकडंच लागलेलं असतं. आपण त्या व्यवधानात असल्याने समोरून एखादा ओळखीचा माणूस येत असला तरी आपले त्याकडे लक्षच नसते. म्हणजे डोळय़ांनी त्या माणसाला पाहिल्याचे मनाला सांगितले असते पण मन इतरत्र गुंतले असल्याने मनाने डोळय़ांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलेले असते. म्हणजेच इथे डोळय़ांनी बघण्याचे सामर्थ्य निश्फळ झालेले असते. भगवंत म्हणतात तसं इंद्रिये आणि विषय ह्यांचे जरी ऐक्मय झाले पण त्यावेळी जर मनाचे तिकडे लक्ष नसेल, तर ते विषय भोगावयास मिळत नाहीत. कारण इंद्रियांना उपभोगाची स्फूर्तीच होत नाही. इथे मनाची इच्छा फार प्रभावी ठरते. विषय भोगायचे की नाही हे मनच ठरवते. विषयातून मनाचे लक्षच जर उडाले तर ते आसक्तिरहीत होते अशा निरासक्त मनापुढे, इंद्रियांच्या इच्छेचे काहीच चालत नाही. कारण इंद्रियांचा सर्व समुदाय मनाच्या स्वाधीन असतो म्हणून इंद्रियांकडून मनाचे नियमन कधीही घडत नाही. मनाबद्दल बोलताना भगवंत पुढे म्हणाले, काळ हा आपल्या सामर्थ्याने सर्व भक्षण करतो, परंतु मनाचे एक रोमसुद्धा त्याच्याने उपटवत नाही. उत्पत्ती, स्थिती व प्रलय करणाऱया काळालादेखील मन आटपत नाही. मन हे शस्त्राने मुळीच तुटावयाचे नाही. पाणीदेखील मनाला विरघळवू शकत नाही. अग्नीही मनाला जाळू शकत नाही किंवा आकाश मनाला शून्यरूप करू शकत नाही. मनाला दुखणे लागू शकत नाही. मन रोडावेल असा कोणताही रोग नाही. मन ताब्यात ठेवता येण्यासारखी एखादी सिद्धिही खरोखर कोठे दिसत नाही.
मन कोटय़वधि ब्रह्मदेव उत्पन्न करते, मन ब्रह्मांडे उत्पन्न करते व ती नाहीशी करते. मन आपल्या कल्पनेच्या कडकडाटाने सर्व त्रैलोक्मयाला जबरदस्तीने नाचवते. मन हे कळिकाळालासुद्धा छळते. मनाला ताब्यात ठेवील असं कुणीच नाही. मनाने हरिहरांनासुद्धा ताब्यात ठेविले आहे. असल्या ह्या मनासमोर कोण टिकून राहील? मनाला जिंकील असा पराक्रमी देव, मानव, राक्षस, कोणीही दिसत नाही. मनाचा महिमा असा अगाध आहे, म्हणूनच ह्याला ‘देव’ असे म्हणतात. मनाची स्थिती मोठी अनावर आहे. अशा या मनावर ताबा मिळवून त्याला आटोक्मयात आणण्याची शक्ती फक्त सद्गुरूंकडे असते.
उद्धवा, त्याबद्दल तुला सविस्तर सांगतो. सावधपणाने लक्ष देऊन श्रवण कर. ज्याप्रमाणे हिऱयानेच हिरा कापतात किंवा काटय़ानेच काटा काढतात, त्याप्रमाणे मनानेच मनाला आवरून धरता येते परंतु जेव्हा पूर्णपणे गुरूची कृपा प्राप्त होते, तेव्हाच हे शक्मय होते. सद्गुरु कृपेपुढे मनाचे काही चालत नाही कारण मन हे गुरुकृपेपाशी आंदण दिलेली दासी आहे. मन हे सद्गुरूला नेहमी भीत असते. ते गुरूच्या पायांपाशी ठेवले असता साधकांना संतोष देते. ह्या मनाचा एक उत्तम गुण आहे. तो म्हणजे ते एकदा एखाद्या गोष्टीच्या मागे लागले की, काही झाले तरी त्या गोष्टीची पाठ सोडत नाही. सद्गुरूंच्या कृपेने ते जर ते आपणहून परमार्थाकडे लागले, तर चारही मुक्तींना आपल्या पायाची दासी करून ठेविते आणि परब्रह्मच बांधून हातात देते.
क्रमशः