अध्याय एकविसावा
वेदाबद्दल बोलताना भगवंत म्हणाले,
वेदांमध्ये अग्नी, इंद्र, वरूण, उषा, मरुत अशा विविध देवतांची स्तुतीपर सूक्ते आहेत. वैदिक ऋषींनी निसर्गातील वेगवेगळय़ा शक्तींना उद्देशून रचलेली ही स्तोत्रेच आहेत. ईश्वराशी मनाने एकरूप झाल्यावर ऋषीमुनींच्या तोंडून वेदवचन सांगितले गेल्यामुळे त्यात सांगितलेले तत्वज्ञान हे ईश्वरी मनोगत आहे हे स्पष्ट आहे. त्यातील तत्वज्ञानाचे सार म्हणजे ब्रह्म सत्य जगत मिथ्या हे होय.
उद्धवाचे भाग्यच मोठे! कारण, सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्वरूपांचे सुख तो भोगत होता. हे केवळ श्रीकृष्णकृपेचे माहात्म्य होय. सद्गुरुंची जेव्हा परिपूर्ण कृपा होते, तेव्हा जीवाची आवड हीच प्रमाण असते. त्याने जर सगुण मूर्ती मागितली, तर गुरुही तीच देतात. निर्गुण स्वरूपाची प्राप्ती व्हावी, असे त्याच्या मनात असेल, तर गुरूची कृपा त्याला निर्गुणस्वरूपाच्या स्थितीत निश्चलपणे नांदविते किंवा सगुण व निर्गुण ह्या दोन्ही स्वरूपांचा उपभोग घ्यावयाची ज्याच्या मनात आवड असेल, तर त्याच्या त्या दोन्ही आवडी पुरविण्याविषयी कृपाळू गुरु समर्थ असतात. सद्गुरूचा महिमा अगाध आहे, तो वेदालासुद्धा सांगता येत नाही. त्यांची परिपूर्ण कृपा झाल्यानंतर कोणताच पदार्थ दुर्लभ नाही.
त्या श्रीकृष्णाच्या कृपेमुळे उद्धवाचे ते दुर्लभपण नाहीसे झाले आणि सगुण व निर्गुण दोन्ही कृष्णच आहे, ही खूण हृदयाला पुरती पटली. ही कृष्णाची परिपूर्णता जाणून, त्याच्या चरणकमळी लक्ष ठेवून उद्धवाने धावून जाऊन श्रीकृष्णचरणावर लोटांगण घातले. तेव्हा सावळय़ाने आपले कंकण घातलेले चारही हात पसरून प्रेमाने उद्धवाला उठविले आणि स्वानंदाने आलिंगन दिले. त्या आलिंगनाचे सुख अनुभवी असतील तेच जाणतील. त्या वेळी उद्धवाला जो आनंद झाला, त्याचा जाणता एक श्रीकृष्णच होय. भगवंत म्हणाले, उध्दवा! हा विसाव्याचाही विसावा, माझ्या वेदरहस्याचा गुप्त ठेवा, तो हा एकविसावा अध्याय मी तुला सांगितला. ह्याने लिंगदेहाचे बळ मोडते. जीवाला जीवपणा आठवत नाही. तो हा एकविसावा अध्याय तुला मी सांगितला. ज्याच्या योगेकरून देहभावना मिथ्या होऊन जाते व नामरूपावर पाणी पडते. या एकविसाव्या अध्यायात अज्ञानाचा नाश व ज्ञानाचाही अभाव होऊन जातो. ज्याकरिता वेदही वेडावून जातो, ज्ञानही लाजून नाहीसे होते, अनुभव बुडून जातो, तो हा वेदाचा अर्थ मी तुला
सांगितला.
हे वेदार्थसाराचे निरूपण म्हणजे माझे विश्वात्म्याचे गुप्त निधान आहे. उद्धवा! तुला म्हणूनच मी ही माझ्या जीवाची सारी खुण सांगितली. सद्गुरूंचे महात्म्य सांगताना भगवंत म्हणाले, उद्धवा! कोटय़वधि जरी साधने केली, तरी माझे हे गुप्त निधान गुरुकृपेशिवाय कोणाच्याच हाती लागावयाचे नाही हे लक्षात ठेव. ती गुरुकृपा साध्य करण्यासाठी आपण पूर्ण स्वधर्माप्रमाणे आचरण करावे. त्याच्याकरिताच शास्त्रश्रवण व वेदपठणही त्याकरिताच करावे. त्या गुरुकृपेसाठी आपण दीनाचेही दीन व्हावे व संतांचे चरण धरावे म्हणजे स्वामी जनार्दन प्रसन्न होईल. श्रीगुरु प्रसन्न होऊन स्वतःहून भागवताचे निरूपण करवताहेत. म्हणून एकनाथ जनार्दन स्वामींना विनंती करीत आहे की, नित्य नूतन कृपा करत असावे.
पुढच्या अध्यायामध्ये उद्धव प्रकृती-पुरुषाचे लक्षण व तत्त्वांच्या संख्येचे सारे विभाग याविषयी प्रश्न विचारेल. त्याचे उत्तर सांगताना जन्ममरणाचा प्रकारही स्वतः श्रीकृष्ण सांगतील. त्या कथेत गहन परमार्थ भरलेला आढळेल. त्या कथेचे श्रवण करताना वैराग्य कडकडून उठेल, अशाच विस्ताराने श्रीकृष्ण स्वतः निरूपण करतील. घटाकाश महाकाशात मिसळून जाते त्याप्रमाणे एकनाथ जनार्दनाला शरण आहे. त्याचे चरणाला वंदन केले असता आपोआपच रसाळ निरूपणाची स्फूर्ती
होते.
याप्रमाणे एकादशस्कंधामधील श्रीकृष्ण-उद्धवसंवादाचा ‘वेदत्रयविभागनिरूपण’ या नावाचा एकविसावा अध्याय समाप्त झाला.