ऑनलाईन टीम / लखनऊ :
हिंदूंनी दोन नव्हे तर चार मुले जन्माला घालावीत. यातील दोन मुले ही कुटुंबासाठी असावीत आणि उर्वरित दोन मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि विश्व हिंदू परिषद (VHP) यांच्याकडे सोपवावीत, जेणेकरून ती राष्ट्रयज्ञात योगदान देऊ शकतील.आमच्यासाठी राष्ट्र सर्वोच्च असले पाहिजे, असे हिंदुत्ववादी नेत्या साध्वी ऋतंभरा (sadhvi ritambhara) यांनी म्हटले आहे.
विश्व हिंदू परिषदेतर्फे उत्तरप्रदेशच्या (uttar pradesh) कानपूर येथे रामोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना साध्वी ऋतंभरा म्हणाल्या की, प्रत्येक हिंदूने दोन मुलांच्या विचारातून बाहेर पडले पाहिजे. हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा. त्यातील दोन मुले ही स्वतःच्या कुटुंबासाठी ठेवावीत आणि उर्वरित दोन मुलांपैकी एक मुलगा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणि दुसरा विश्व हिंदू परिषदेला अर्पण करावा, असे केले तरच भारत लवकर हिंदूराष्ट्र होईल.
तसेच देशामध्ये तातडीने समान नागरी कायदा लागू करण्यात यावा. तसे केले तर लोकसंख्येमध्ये असमतोल राहणार नाही. देशाच्या लोकसंख्येमध्ये असमतोल असेल तर राष्ट्राचे भवितव्य देखील चांगले राहणार नाही,असेही त्या म्हणाल्या.