प्रा. स्वरुपा इनामदार यांचे मत
प्रतिनिधी / बेळगाव
कबीर म्हणजेच ईश्वर आणि ईश्वरी व्यवहारातून आलेली वाणी हेच कबीर ज्ञान आहे. कबीर हे समाज सुधारक, क्रांतीकारक, भक्तशिरोमणी होते. एकतारी भजनातून कबिरांनी अनेक पदे अनेक दोहे असा जणू रत्नखजिना निर्माण केला अहे. ते समाजाच्या डोळय़ामध्ये अंजन घालून मानवतेचा संदेश देत. यातूनच कबीरपंथ निर्माण झाला. तो आजच्या युगालाही बोधक आहे. कबीरांनी हिंदू-मुस्लिम एकता साधून सहज सरळ भक्तीमार्ग प्रदिप्त केला आहे, असे मत प्रा. स्वरुपा इनामदार यांनी केले.
शब्दगंध कवी मंडळ आणि सरस्वती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कालिदास स्मरण दिनानिमित्त ‘कबीरनिती’ या विषयावर प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. स्वरुपा इनामदार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शब्दगंधचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरूवात झाली. प्रास्ताविक व स्वागत सुधाकर गावडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय स्मिता किल्लेकर यांनी केला.
यावेळी प्रा. आलगोंडी म्हणाले, तुकारामांनी जे अभंगांतून मांडले तेच कबीरांनी आपल्या दोहांमधून मांडले. कबीरांनी धार्मिक थोतांडावर प्रखरपणे प्रहार केला. त्यामुळेच त्यांना पुरोगामी संत म्हणून ओळखले जाते. विज्ञानवादी सिध्दांत मांडताना कबीरांनी सत्य विज्ञान आणि कर्मसिध्दांत यावर विशेषत्वाने लिहिले आहे.
यावेळी प्रा. सुभाष सुंठणकर, अश्विनी ओगले, शोभा लोकूर, प्रा. संजय बंड, गोविंद कारेकर, डॉ. प्रेमा मेणशी आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन रेखा गदे यांनी केले तर चंद्रशेखर गायकवाड यांनी आभार मानले.