लोखंड गंजले, संरक्षक कठडे कोसळले
प्रतिनिधी /वाळपई
गेल्यावषी मुसळधार पाऊस लागल्यामुळे पैकुळचा पूल वाहून गेला होता. सदर पुलाचे बांधकाम अजूनही पूर्ण झालेले नाही. असे असतानाच यंदा पावसाळय़ाच्या सुरुवातीला शेळ मेळावली येथील साकववजा पुलाची अवस्था पूर्णपणे बिकट झाली असून तो कोसळल्यास शेळ मेळावली, धडा साकोर्डा आदी भागातील गावांचा गुळेली मार्गे संपर्क पूर्णपणे तुटणार आहे, तसे झाल्यास या गावातील ग्रामस्थांसमोर समस्या निर्माण होईल.
शेळ मेळावली येथील पूल पूर्णपणे जुना झाला आहे. या पुलाची अवस्था सध्यातरी दयनीय झालेली आहे. पुलाचे लोखंड पूर्णपणे गंजले असून तो वाहतुकीसाठी धोकादायक बनलेला आहे. रविवारी लागलेल्या पावसामुळे पुलाच्या बाजूचे कठडे कोसळले असून प्रमुख रस्त्यावर भेगा गेलेल्या आहेत. या पुलाचे नव्याने बांधकाम करावे अशी मागणी यापूर्वी केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे लक्ष दिले नाही. यामुळे हा पूल कधीही कोसळू शकतो अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
या गावातील ग्रामस्थांना गुळेली येथे जाण्यासाठी याच पुलाचा वापर करावा लागतो. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे सदर पूल कोसळल्यास अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. सध्यातरी सदर धोकादायक पुलाच्या ठिकाणी तात्पुरती व्यवस्था करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शेळ मेळावली धडा साकोर्डा आदी भागांमध्ये जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागत आहे. सदर भागात मोठय़ा प्रमाणात वाहनांची ये-जा असते. सध्या शाळा सुरू झालेल्या आहेत. हा पूल कोसळल्यास विद्यार्थी वर्गाचे हाल होऊ शकतात असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पैकुळ पुलाचे बांधकाम अपूर्ण
गेल्यावषी महापुराचा तडाखा बसून पैकुळ येथील जुना पूल कोसळला होता. या पुलाचे बांधकाम सरकारने सुरू केलेले आहे. मात्र बांधकाम अजून पर्यंत पूर्ण झालेले नाही. जलसंपदा खात्यातर्फे सदर नदीवर पदपूल उभारलेला आहे. सदर पदपूल हा कमी उंचीचा असल्यामुळे पाण्याची पातळी वाढल्यास या पुलाचा वापर करता येत नाही. त्याप्रमाणे या पुलावरून जाण्यासाठी नागरिकांना मुठीत जीव धरून जावे लागते. त्यामुळे सदर पुलाचे बांधकाम लवकरातलवकर पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.