पंचायत क्षेत्राबाहेरच्या लोकांनी किनाऱ्याचा ताबा घेण्याच्या प्रयत्नांना विरोध करण्याचा इशारा
वार्ताहर /खोल
आगोंद पंचायतीची ग्रामसभा भुरिम, आगोंद येथील भूमिपुरुष सभागृहात होऊन त्यात विविध ठरावांवर चर्चा करण्यात आली. यावेळी साळेरी-खोल येथील मच्छीमारांनी शनिवारी काढलेल्या मोर्चाचे पडसाद उमटले. पारंपरिक मच्छीमारांना अत्यंत वाईट दिवस आले असून पारंपरिक मच्छीमारांनी पर्यटन व्यवसायात पदार्पण केले आहे. पाळोळे तसेच इतर ठिकाणी आम्हाला या व्यवसायात मज्जाव करण्यात आल्याने आमच्याच आगोंद किनारी भागात पर्याय म्हणून जलसफरीचा व्यवसाय सर्व सोपस्कार पूर्ण करून सुरू केला. मात्र पंचायत क्षेत्राबाहेरच्या लोकांनी या किनाऱ्याचा ताबा घेण्याच्या प्रयत्नाला संपूर्ण शक्तीनिशी विरोध करू, असे उपस्थित अनेक मच्छीमार समाजबांधवांकडून ग्रामसभेत स्पष्ट करण्यात आले.
11 रोजी साळेरी, खोल येथील मच्छीमारांनी ‘आमची बीच आमका जाय’चा नारा घेऊन आगोंद किनाऱ्यावर काढलेल्या मोर्चाचा आगोंदचे पंच नीलेश पागी यांनी निषेध केला. येथे 80 टक्के टॅक्सी व्यवसाय खोल येथील युवकांकडून चालविण्यात येत आहे. पर्यटन खात्याची रीतसर परवानगी तसेच पंचायतीचा ना हरकत दाखला व सर्व सोपस्कार पूर्ण न करता साळेरी येथील एक युवक आगोंद किनाऱ्यावर असोसिएशनच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्यांना सरळसरळ प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करत आहे. समाजात दुफळी माजवण्याचा डाव या मोर्चामागे आहे, असा दावा पागी यांनी केला.
खोल पंचायत क्षेत्रातील अनेक महिला आगोंद पंचायत क्षेत्रात रस्त्यानजीक मासेविक्रीचा व्यवसाय करत आहेत. हा प्रकार त्वरित बंद करण्यात यावा, असा ठराव संजू पागी यांनी मांडल. या ठरावास हजर असलेल्या सर्व ग्रामस्थांनी सहमती दर्शवली. मात्र या प्रकरणी खोल पंचायत व आगोंद पंचायत, दोन्ही पंचायत क्षेत्रांतील काही निवडक सदस्य यांनी सामंजस्याने समझोता घडवून आणण्याचे प्रयत्न करावेत, असा सल्ला काही जबाबदार नागरिक व पंचांनी दिला.
या ग्रामसभेला सरपंच फातिमा रॉड्रिग्स, उपसरपंच प्रितल फर्नांडिस, जॉन फर्नांडिस, नीलेश पागी, रामनाथ पागी, पॅनिशा फर्नांडिस, फळदेसाई व सचिव अमोल ना. गावकर उपस्थित होते. गटविकास अधिकारी कार्यालयाचा प्रतिनिधी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. आगोंद पंचायत क्षेत्रात व खास करून किनारी भागात वीज समस्या हा नित्याचीच बनून राहिली आहे. ही समस्या निकालात काढावी. धुमाणे येथील पुलाजवळ रस्ता ऊंदीकरणाची गरज, आगोंद नदीत नागरिकांकडून टाकण्यात येणारा कचरा, नदीत वळवलेले दूषित पाणी, शॅकचालकांकडून रात्रीच्या वेळी सर्वत्र टाकण्यात येणारा कचरा, असे मुद्दे यावेळी उपस्थित करण्यात आले. चर्चेत नंदकिशोर फळदेसाई, पांडुरंग सावंत, ट्रिफन फर्नांडिस, कायतान फर्नांडिस, लुईस, प्रकाश फळदेसाई, नवनाथ ना. गावकर, नितीन गावकर यांनी भाग घेतला.