भारतीय वैज्ञानिकांनी केली कमाल
विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवे आविष्कार करणाऱया भारतीय वैज्ञानिकांनी पुन्हा एकदा कमाल केली आहे. वैज्ञानिकांनी खाऱया पाण्याने पेटणारा कंदिल विकसित केला आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी खाऱया पाण्याचा हा कंदिल सादर केला आहे.
भारताच्या पहिल्या खाऱया पाण्याच्या कंदिलाला ‘रोशनी’ नाव देण्यात आले आहे. या एलईडी लँपला प्रज्ज्वलित करण्यासाठी समुद्राच्या पाण्याचा वापर होतो. यात विशेषकरून इलेक्ट्रोड डिझाइन करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी कोस्टल रिसर्च वेसल सागर अन्वेषिकाचा दौरा केला. भारताच्या खोल महासागर मोहिमेचे कामकाज पाहण्यासाठी तेथे ते या नौकेवर पोहोचले होते. चेन्नईतील राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था याचे संचालन करते.
गरीब तसेच गरजूंसाठी खाऱया पाण्याचा कंदिल उपयुक्त ठरणार आहे. या विशेष कंदिलामुळे भारताच्या 7500 किलोमीटर लांब किनारपट्टीवर राहणाऱया मच्छिमारांना मोठा लाभ होणार आहे. खाऱया पाण्याने संचालित होणाऱया ‘रोशनी एलईडी लँप’मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उजाला योजनेला बळ मिळणार आहे. उजाला योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होत. रोशनी लँपसह ऊर्जा मंत्रालयाकडून सोलर स्टडी लँप यासारख्या योजना राबविण्यात येत आहेत अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी दिली.
या तंत्रज्ञानाचा वापर किनारपट्टी नसलेल्या भागातही करता येणार आहे. पाण्यात मिठ मिसळून या कंदिलाचा वापर करता येणार आहे. हा कंदिल अत्यंत सहजपणे वापरता येतो तसेच यात खर्चही कमी येतो. केंद्रीय मंत्र्यांनी खाऱया पाण्याच्या कंदिलाचा आविष्कार करणाऱया वैज्ञानिकांचे कौतुक केले आहे.