माजी खासदार संभाजीराजे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली उपाय योजना करण्याची मागणी
प्रतिनिधी/कोल्हापूर
ऐतिहासिक किल्ले पन्हाळागडाचे जतन, संवर्धन होत नाही. केंद्रीय पुरातत्व विभागासह प्रशासनानाचे दुर्लक्ष झाल्याने या गडाची तटबंदी, बुरूज ढासळू लागले आहेत. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने या पन्हाळगडाला वाचविण्यासाठी कायम स्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून संभाजीराजे यांनी पन्हाळा गडावरील दूरवस्था आणि गंभीर स्थिती मांडली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः जातीने या प्रकारात लक्ष घालावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
संभाजीराजे यांनी पत्र म्हटले आहे की, महाराष्ट्रातील ऐतिहासिकदृष्टय़ा सर्वात महत्वाच्या अशा तीन राजधानीच्या किल्ल्यांपैकी एक असलेल्या आणि करवीर छत्रपतींची राजधानी म्हणून ओळखला जाणारा किल्ले पन्हाळगड अखेरची घटका मोजत आहे. पावसामुळे किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज ढासळले असून अनेक ठिकाणी भेगाही पडत आहेत. कोल्हापूर जिह्याला गेल्या काही वर्षांपासून महापुराचा सामना करावा लागतोय, या संततधार पावसामुळे पन्हाळा किल्ल्याचे अस्तित्व सुद्धा धोक्यात आले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले ग्रामस्थही इथे दिवस रात्र भीतीच्या छायेत जगत आहेत. बुरुज आणि तटबंदी कोसळल्यामुळे पायथ्याशी असलेल्या गावात मोठमोठे दगड आणि पाण्याचे लोट येत आहेत. दुर्दैवाने काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न असून या गंभीर प्रकाराकडे प्रशासन कानाडोळा करत आहे असे चित्र दिसते.
ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याची भीती
राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असल्याने पन्हाळ्याला केंद्रीय पुरात्तव खात्याचा पूर्ण वेळ प्रभारी अधिकारी असणे आवश्यक आहे. पण अशा अधिकारी नसल्याने राज्य शासनाची ही जबाबदारी महत्वाची ठरते. वेळीच किल्ल्याची डागडुजी व संवर्धन केले नाही तर हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती ताराराणी यांच्या पराक्रमाचा वारसा लाभलेला ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. पन्हाळगडाकडे दुर्लक्ष करणाऱया प्रशासन व नगरपालिकेबाबत शिवप्रेमी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री म्हणून आपण यामध्ये तातडीने लक्ष घालून प्रशासनाला योग्य त्या उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश द्यावेत, असे आवाहनही संभाजीराजे यांनी या पत्रात केले आहे.
हे ही वाचा : श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात एका पोलीस कर्मचारी शहीद, तर दोन जखमी