ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोणत्याही पक्षाकडे बहुमत नाही. त्यामुळे या जागेसाठी रस्सीखेच सुरू असून, संभाजीराजे यांनी अपक्ष लढण्याची हाक दिली आहे. त्यामुळे या जागेचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. इतर पक्षांकडून पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा संभाजीराजे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र शिवसेनेत प्रवेश केला तरच त्यांना उमेदवारी देता येईल अशी अट शिवसेनेने घातली. त्यावर दोन दिवसांपूर्वीच संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र, यावर तोडगा निघाला नव्हता. सध्या शिवसेनेचे शिष्टमंडळ संभाजीराजे सध्या मुक्कामास असलेल्या मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल झाले आहे. उद्धव ठाकरेंची अट संभाजीराजेंना मान्य असल्याचे समजत आहे. त्यामुळे लवकरच सहाव्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
काहीवेळापूर्वीच शिवसेनेचे अनिल देसाई, उदय सामंत आणि मिलिंद नार्वेकर या तीन नेत्यांचे शिष्टमंडळ संभाजीराजे यांच्या भेटीसाठी ट्रायडंट हॉटेलमध्ये दाखल झाले आहे. राज्यसभेवर निवडून जायचे असेल तर संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा. अन्यथा आम्ही सहाव्या जागेवर आमचा उमेदवार रिंगणात उतरवू, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. तर मला शिवसेना नको तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषित करा, अशी मागणी संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. या मागणीवर समझोता झाल्याची माहिती मिळत आहे. लवकरच संभाजीराजे यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती देऊ शकतात.