कोकणाला लोककलांचा समृध्द वारसा लाभला आहे. या लोकलला कोकणला वैचारिक समृध्दी, सजगता प्रदान करण्यात अनमोल योगदान देत आहेत. तसेच योगदान संगीत नाटकांनीही दीर्घकाळ दिले आहे. शहरीच नव्हे तर त्यापेक्षा कितीतरी पटींनी ग्रामीण भागात संगीत नाटकांची प्रदीर्घ परंपरा कोकण भूमीत अविश्रांत नांदते आहे. मात्र सध्या ही चळवळ जर्जर होत एका ‘निर्णायक’ वळणावर येऊन ठेपली आहे. कोरोनाने दोन वर्षाहून अधिक काळ पाडून ठेवलेल्या पडद्याने तर तिला पार भूईसपाट करून टाकले आहे.. अशा वेळी खरी गरज आहे ती भक्कम राजाश्रयाची!
गोव्यापासून मुंबईपर्यंत किनारपट्टी भागात संगीत नाटकांची उज्ज्वल परंपरा आहे. नजीकच्या सांगली-सातारा, कोल्हापूर परिसरात खंबीर राजाश्रयामुळे नाटय़मंडळे व कलाकारांनी केलेली घोडदौड कौतुकास्पद होती. त्याचवेळी कोकणात राजाश्रयाशिवायही केवळ ‘नाटय़कंडू’ शमविण्यासाठी गावागावात रंगणाऱया संगीत नाटकांनी त्याच तोडीचे काम केले. विशेषतः राजाश्रय संपू लागण्याच्या काळातही ती तेवढय़ाच डौलाने तळपत राहिली. कारण कोकणात लोकाश्रय जीवंत होता. मात्र गेल्या काही वर्षात नाटय़ मंडळे आणि कलाकारांची प्रचंड दमछाक होऊ लागली, सद्यस्थितीत तर पाठबळाचा ‘ऑक्सिजन’ निकडीचा बनला आहे.
समृध्द परंपरेचा खडतर प्रवास
कोकणात ग्रामदेवतेच्या उत्सवात गावच्या मंडळींनी नाटक, शक्यतो संगीत नाटक सादर करण्याची परंपरा वर्षानुवर्षे जपली गेली. तरुण मंडळी नोकरी-व्यवसायासाठी महानगरात स्थिरावू लागली तरीही वर्षातून एकदा नाटक सादर करण्यासाठी गावी जाण्याचा ध्यास ही चळवळ जीवंत ठेवण्यात मोलाचा ठरला. उपलब्ध साधनसामुग्री वापरून सादर होणारे प्रयोग प्रेक्षकांनीही डोक्यावर घेतले. मात्र हे सारे त्याच उत्साहाने पुढे चालवणे असाध्य बनले आहे. संगीत नाटकासाठी येणारा खर्च, घटता प्रेक्षकवर्ग, कमी वेळेत दमदार सादरीकरणाची अपेक्षा, धकाधकीच्या जीवनशैलीत कलावंतांचा मेळ साधण्याची कसरत यासह नाटय़गृहांची उपलब्धता आणि त्यांचे भाडे, नव्या दमदार संहितांची वानवा अशा विविध कारणांनी संगीत नाटकांचा प्रवास खडतर बनत आहे.
केवळ ‘इतिहास’ राहण्याची भीती
नाटय़क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी शासकीय स्तरावर काही अनुदान योजना, स्पर्धा एवढाच एकमेव काडीचा आधार सध्या नाटय़ मंडळांना आहे. जनाधार कमी होत असताना शासनाने भक्कम आधार देण्यास आणखी उशीर केला तर कदाचित हा सारा प्रवास फक्त ‘इतिहास’ म्हणूनच अभ्यासण्याची वेळ येऊ शकते. गेल्या काही वर्षात शासकीय स्तरावर निश्चितपणे काही प्रयत्न झाले. परंतु ते तोकडे आहेत.
फडणवीस सरकारच्या अखेरच्या टप्प्यात मंत्री विनोद तावडे यांनी राज्यभरातील नाटय़कर्मींची मते आणि सूचना ऐकून घेतल्या होत्या. रत्नागिरीतील नाटय़कर्मींशी चर्चेदरम्यान या क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत मंडळींनी काही प्रस्ताव सादर केले होते. तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासनही मिळाले. मात्र त्यानंतर ‘पून्हा परत येणे’ झाले नाही आणि ही चर्चाही वांझोटी ठरली. आता सरकार बदलले, खात्याचे नेतेही बदलले त्यामुळे राजाश्रयासाठी पुन्हा नवा श्रीगणेशा करण्यापासून अन्य पर्याय मंडळांसमोर नाही.
राजाश्रयातही तफावत
शासनाच्या सांस्कृतिक कला संचालनालयामार्फत हौशी नाटय़, बाल नाटय़, संगीत नाटक, व्यावसायिक नाटकांसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. बहुतांश भागात संगीत नाटके या स्पर्धेपुरतीच शिल्लक राहिल्यासारखी आहेत. मात्र यातील बक्षिस रकमेतील तफावतीवर अनेक संगीत नाटय़मंडळांची नाराजी आहे. व्यावसायिक नाटकाला 7.5 लाख, 5.5 लाख व 3.5 लाख अशी अनुक्रमे बक्षिसे मिळतात, हौशी नाटकांसाठी हिच रक्कम 6, 4 व 3 लाख आहे. त्याचवेळी संगीत नाटकांना 1.5 लाख, 1 लाख आणि 50 हजार अशी अनुक्रमे बक्षिस योजना आहे. संगीत नाटकांच्या निर्मितीसाठी केवळ 10 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. नेमक्या याच दोन घटकांबाबत नाटय़ संस्थांना काही बदल अपेक्षित आहेत.
अनुदान, बक्षिस योजनेत बदलांची अपेक्षा
मुळातच संगीत नाटकाचा डोलारा सांभाळताना न टाळता येणारा खर्च म्हणजे पौराणिक पोषाख, नेपथ्य आणि अन्य साधने. राज्यात मोजक्या ठिकाणीच त्यांची उपलब्धता आहे. नाटय़संस्थांच्या मते स्पर्धेसाठीच्या प्रत्येक नाटकाला किमान 40 ते 50 हजार रुपये खर्च करावेच लागतात. स्पर्धा केंद्र लांब असल्यास प्रवास अन वाहतुकीवरही मोठा खर्च होतो. शासनाकडून विशिष्ठ प्रवासभाडे आणि तोकडा दैनिक भत्ता दिला जातो. छोटय़ा-मोठय़ा पडद्यासह नेटवर्कनेही या क्षेत्रासमोर काही नवी आव्हाने निर्माण केलेली आहेत. सुयोग्य गायक अभिनेता आणि अभिनेत्रींची उपलब्धता हा देखील गहन प्रश्न आहे.
संगीत नाटक मंडळींनी यासाठी विविध पर्याय सुचवले आहेत. यामध्ये नाटकांच्या निर्मितीसाठी दिली जाणारी 10 हजारांची रक्कम किमान गुणांचा निकष लावून 50 हजार करणे. तंत्रज्ञ, वैयक्तिक बक्षिसे आणि अभिनय प्रमाणपत्रांची संख्या वाढविण्याचाही अपेक्षा आहे. संगीत नाटकांसाठी परवडणाऱया दरात चांगल्या स्थितीतील नाटय़गृहांची उपलब्धता या प्रमुख मागण्या आहेत. अन्य मागण्या टप्प्याटप्प्याने अंमलात आल्या तरी चालेल. मात्र या दोन बाबींवर तातडीने अंमलबजावणी झाल्यास संगीत नाटकांना चालना मिळेल. नवीन नाटकासाठी जादा गुणांची तरतूद आणि नवीन लेखकांना अनुदान या बाबींचे नाटय़ मंडळांनी स्वागत केले आहे. काही नाटय़कर्मींच्या मते राज्यभर प्रवेशिका मागवून, प्रयोगांचे परीक्षण करून निवडक नाटकांना प्रत्येकी किमान 5 प्रयोग सादर करण्यासाठीची सर्व व्यवस्था खर्चासह उपलब्ध करून द्यावी.
व्यापक पाठबळ अत्यावश्यक
महानगरांमध्ये उद्योग क्षेत्राचे पाठबळ काही नाटय़ संस्थांना मिळते, साखर कारखाने, स्थानिक लोकप्रतिनिधींचा हात काही मंडळांना मिळतो. कोकणात मात्र यातले काहीच नसल्याने येथील समस्या अधिक जटील आहेत. अशा चहुबाजूने अडचणी असूनही गोव्यामागोमाग सर्वाधिक संघ सहभागी करणारा भाग रत्नागिरी केंद्राचे नाव घेतले जाते. मुंबई-पुणे यांचा क्रमांकही त्यानंतर घेतला जातो, ही अभिमानाची बाब आहे. अशा खडतर काळातही येथील तंत्रज्ञ, वादक आणि कलाकारांनी गेल्या दशकात वेगवेगळ्या पातळ्यांवर स्वतःला सिध्द करत संगीत नाटय़क्षेत्राला ऊर्जा प्रदान करण्यात कसर सोडलेली नाही. या सर्वांसमोर भविष्यातील वाटचालीचे चित्र मात्र धुसर आहे. ते लख्ख प्रकाशित करण्यासाठी शासन आणि उद्योगांच्या सामाजिक दायित्व निधीचा भक्कम आधार उभा राहणे किंवा लोकसहभागातून निधी उपलब्धता यासाठी आश्वासक तरतूद हाच पर्याय आहे. यासाठी ‘आघाडी’चे शिलेदार कसे सरसावतात यावरच कोकणातील संगीत नाटकांचे भवितव्य अवलंबून आहे.
विश्वेश जोशी