जळगाव / प्रतिनिधी :
जळगाव जिल्हयातील मुक्ताई नगर तालुक्यातील मुक्ताई भवानी या वनक्षेत्राला अखेर अभयारण्याचा दर्जा घोषित करण्यात आला आहे. यामुळे या परिसरातील केळाच्या बनात राहणाऱ्या तब्बल नऊ वाघांना सुरक्षित अधिवास मिळणार आहे. गेल्या 15 वर्षांपासून वन्यजीव प्रेमींच्या या बाबतच्या लढयाला अखेर यश आले असून, आता या भागात व्याघ्र प्रकल्प जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनक्षेत्रात वाघांचे अस्तित्त्व सातत्याने आढळून आल्यानंतर सातपुडा बचाव समितीने या वनक्षेत्रात व्याघ्र प्रकल्प करावा, ही मागणी केली. प्रारंभी वनविभागाने या भागात वाघ असल्याचा इन्कार केला होता. यावर सातपुडा बचाव समितीने या बाबतचे ठोस पुरावे सादर केले होते. त्यानंतर वढोदा क्षेत्रात वाघांचे प्रजनन होऊ लागल्याने मादी वाघ, त्यांचे बछडे दिसू लागले. पूर्णा नदीच्या पाणीक्षेत्र लगत असलेले जंगल केळीच्या बागा आणि तृणभक्षक प्राण्यांचा मोठयाप्रमाणावर वावर यामुळे या परिसरात वाघांची संख्या झपाटयाने वाढू लागली. केळीच्या बागात वाघांचा अधिवास दिसू लागला. अखेर याची वन विभागाला दखल घ्यावी लागली. सातपुडा बचाव समितीची आग्रही मागणी पाहता 2020 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुक्ताईनगरला जाहीर सभेत बोलतांना या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. यासाठी एक तज्ञ समिती स्थापन केली गेली. या समितीच्या सदस्यांनी या वनक्षेत्रात पाहणी करून अहवाल सादर केला होता. त्यानुसार मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेऊन मुक्ताई भवानीला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.
मुक्ताई भवानी वनक्षेत्र 122.740 चौरस किमी असून, यात बारा गावांचा समावेश आहे. यामध्ये चारठाणे, वायला चिंचखेडा, नांदवेल, सुखळी, दुही, मोरझिरा, राजुरे जोंधनखेडा, वढोदा या गावांना जोडून असलेल्या वनक्षेत्रात वाघांचा मुक्त संचार असून, या परिसरात नऊ वाघ आहेत. या वाघांसोबत बिबटे, हरिण,चौशिंगा हे प्राणी आहेत. अभयारण्य जाहीर केल्यानंतर व्याघ्र प्रकल्प निर्मितीची प्रक्रिया आता सुलभ होईल. डोलारखेडय़ात गाभाक्षेत्र निर्माण करून सर्व सभोवतालच्या वनक्षेत्रात आणि गावात बफर झोन निर्माण करून या गावांच्या आणि तेथील लोकांच्या सर्वंकष विकासाची योजना तयार करण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ पर्यावरणादी आणि वन्यजीवप्रेमी राजेंद्र नन्नावरे यांनी केली आहे. मुक्ताई भवानी अभयारण्य जाहीर झाल्याने या वनक्षत्रात जंगलसफारीव्दारे पर्यटनाला चालना मिळेल, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, या क्षेत्रात वृक्षतोड थांबेल, या भागातील प्राण्यांच्या संरक्षणासाठी वनविभागाला जादा कर्मचारी उपलब्ध करून द्यावे लागतील, अतिरिक्त निधी देखील यासाठी उपलब्ध होऊ शकतो. या परिसरात दुर्मिळ वनस्पती असल्याने त्यांचे संरक्षण देखील होण्यास मदत होईल, असे नन्नावरे यांनी सांगितले.