ऑनलाईन टीम / मुंबई :
मशिदींवरील भोंगा हटविण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून, ठाकरे सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनसेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya thackreay) यांनीही मनसेच्या अल्टीमेटबद्दल बोलताना भोंग्यातून वाढलेल्या किमतींबद्दलही लोकांना सांगावे, पेट्रोल-डिझेल, सीएनजीची दरवाढ कशामुळे झाली? तसेच 60 वर्षांपूर्वीच्या इतिहासात न जाता गेल्या 2-3 वर्षांत काय झालं हे सांगावं, असा टोला लगावला होता. या टीकेला आता मनसेनंही उत्तर दिलं आहे.
आज सकाळीच मनसे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, महागाईवर आम्हीच बोलायचं, पेट्रोल दरवाढीवर पण आम्हीच बोलायचं, करोना काळात जेव्हा तुम्ही लपून बसला होता तेव्हा लोकांच्या समस्या राज ठाकरेंनी सोडवायच्या? तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार आणि टेंडरमधलं कमिशन खाणार का?, असेही देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच या ट्विटला त्यांनी विरप्पन गँग असा हॅशटॅगही दिला आहे.