दीड महिने मुदतवाढ देण्याची मागणी, स्थलांतराबाबत महापौरांना साकडे
प्रतिनिधी/मिरज
शहरातील मिरज-कृष्णाघाट रस्त्यावरील झोपडपट्टय़ांचे अतिक्रमण काढून घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने केवळ दोन दिवसांची मुदत दिली आहे. मात्र, झोपट्टीवासीयांच्या स्थलांतराचा प्रश्न मार्गी लागला नसल्याने त्यांना आणखीन दीड महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केली आहे. शुक्रवारी महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनीही झोपट्टीवासीयांच्या व्यथा जाणून घेतल्या. येत्या दोन दिवसात आयुक्तांशी बैठक घेऊन झोपट्टीवासीयांच्या स्थलांतराचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन महापौर सुर्यवंशी यांनी यावेळी दिले. मिरज-कृष्णाघाट रस्त्यावरील बेळगांव रेल्वे फाटक येथे सुमारे 35 कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधले जाणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटनही झाले. तत्पूर्वी येथील उड्डाणपूलाचे बांधकाम सुरू होण्याआधी येथील झोपडपट्टींचे अतिक्रमण काढण्याची कारवाई रेल्वे प्रशासनाने अंतिम टप्प्यात आणली आहे. मागीलवेळी येथील रहिवाशांना मुदतवाढ दिली होती. मात्र, केवळ दोन दिवसात स्वत:हून घरे न काढल्यास सोमवारी पोलिस बंदोबस्तात घरे हटवली जातील, असा इशारा रेल्वे अधिकाऱ्यानी दिला आहे. रेल्वेच्या या कारवाईला झोपडपट्टीतील रहिवाशी आणि नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी विरोध दर्शविला आहे.