वारणेत 26 टीएमसी पाणीसाठा; दमदार पावसाची प्रतीक्षा; गतवर्षीपेक्षा कोयनेचा साठा 21 टीएमसीने कमी
सांगली प्रतिनिधी
यावर्षी महापुराचा धोका सध्या टळला असला तरी वारणा आणि कोयना धरणातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा खूपच कमी आहे. कोयना धरणातील साठा 21 तर वारणेचा साठा तीन टीएमसीने कमी आहे. जिह्यातही सरासरीपेक्षा कितीतरी कमी पाऊस झाल्याने जिह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
सोमवारी सायंकाळी कोयना धरणातील पाणीसाठा 65.28 टीएमसी झाला आहे. गतवर्षी 1 ऑगस्ट रोजी हे धरण तब्बल 82.51 टक्के भरल्याने साठा 86.64 टीएमसी झाला होता. तर वारणा धरणातील साठा सोमवारी सायंकाळी 26.88 टीएमसी झाला असून गतवर्षी याच दिवशीचा साठा 29.97 टीएमसी होता. अलमट्टी धरणाचा विसर्ग 18000 क्युसेकवर स्थिर ठेवण्यात आला असून 123 टीएमसी क्षमतेच्या या धरणात 106.39 टीएमसी साठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 65.28 (105.25), धोम 9.13 (13.50), कण्हेर 7.28 (10.10), वारणा 26.89 (34.40), दूधगंगा 17.26 (25.40), राधानगरी 6.03 (8.36), तुळशी 2.75 (3.47), कासारी 1.92 (2.77), पाटगाव 2.82 (3.72), धोम बलकवडी 3.37 (4.08), उरमोडी 7.18 (9.97), तारळी 4.92 (5.85), अलमट्टी 106.94 (123).
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेकमध्ये पुढीलप्रमाणे. कण्हेर – 24, वारणा 1215, दुधगंगा – 600, राधानगरी 1000, धोम बलकवडी 335, तारळी 154 व अलमट्टी धरणातून 18 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
जिह्यात 3.3 मिमी पावसाची नोंद
जिह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.3 मि. मी. पावसाची नोंद झाली असून कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक 16.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 2.8 (214.1), जत 1.5 (207.6), खानापूर-विटा 7.2 (256.1), वाळवा-इस्लामपूर 0.6 (303.5), तासगाव 1.3 (214.5), शिराळा 0.2 (641.2), आटपाडी 6 (170.4), कवठेमहांकाळ 16.2 (255.5), पलूस 0.1 (194.6), कडेगाव 5.1 (235.4)