पलूस/प्रतिनिधी
पलूस तालुक्यातील बांबवडे येथील शेतकरी पहाटे शेतात जात असताना रस्त्यावर पडलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पलूस तालुक्यातील बांबवडे येथील शेतकरी ताजुद्दीन मोहम्मद मुल्ला हे पहाटे सायकल वरून जनावरांच्या धारा काढण्यासाठी शेतात जात होते. त्याचवेळी उच्च ११ केव्ही दाबाची असणारी विद्युत वाहिनी तुटून रस्त्यावर पडलेली होती. मात्र सायकलवरून जाणाऱ्या मुल्ला यांनाही तार दिसलीच नाही. त्या तारेचा स्पर्श होताच त्यांना विजेचा जबरदस्त धक्का बसून ते खाली कोसळले व त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडल्यापासून तब्बल अडीच तास विद्युत प्रवाह तसेच सुरू होता. यावेळी नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यासाठी फोन केला असता अधिकारुणी आणि कर्मचाऱ्यांनी फोन उचलला नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच एवढ्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीच खबरदारी घेण्यात आली नव्हती. याबाबत वारंवार सांगूनही महावितरणने दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.