21 किलो चांदीचे, 20 तोळे सोन्याचे दागिने लंपास; रोख पावणेसहा लाखावरही डल्ला
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी शहरातील ज्वेलर्स फोडून चोरट्यांनी तब्बल 20 लाखांचा ऐवज लंपास केला. रोख पावणे सहा लाख रूपये, 21 किलो चांदीचे दागिने, 20 तोळे सोन्याचे दागिने असा मोठा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. विशेष म्हणजे सांगोला (जि. सोलापूर) आणि आटपाडीतून वाहनांची चोरी करून चोरट्यांनी पोलीसांना आव्हान दिले. या घटनेने शहरासह तालुक्यात खळबळ माजली आहे.
आटपाडीच्या मुख्य पेठेत यपावाडीतील शंकरबापू चव्हाण यांच्या मालकीचे ओम गणेश ज्वेलर्स आहे. ज्वेलर्सला रविवारी सुट्टी असते याची माहिती घेती रेकी करत चोटय़ांनी ज्वेलर्सचे शटर, भारीभक्कम लॉक तोडून चोरटय़ांनी ज्वेलर्समधुन सात किलो वजनाचे झुम, पैंजण, साडेसहा किलो वजनाचे लहान पैंजण, तीन किलो वजनाच्या चांदीच्या मूर्ती, करंड, ताट, ग्लास, साडेचार किलो वजनाचे आगरा पायल, 20leesUs सोन्याच्या दागिन्यांचे मोड आणि 5 लाख 75 रोख असा ऐवज चोरट्यांनीलंपास केला.
दुकानाच्या वरील बाजूस रहायला असलेल्या दस्तगीर शेख यांच्या पत्नीने खाली चोरटय़ांच्या हालचाली पाहून आरडा-ओरडा केला. हे पाहून चोरट्यांनी चारचाकी गाडीतुन सुमारे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास पोबारा केला. त्यानंतर दस्तगीर शेख यांनी घटनेची माहिती सोमवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमार शंकरबापू चव्हाण यांना दिली. त्यांनी घटनास्थळी जलद धाव घेतली असता चोरट्यांनी शटर खुले ठेवून दागिने, रोकड घेवून पोबारा केल्याचे स्पष्ट झाले. चोरटय़ांनी ज्वेलर्समधील व बाहेरील सीसीटीव्ही कॅमेराही फोडला आहे.
चोरीची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अजय सिंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन कनप, अमोल ऐदळे, अच्युत सुर्यवंशी, राजु शिरोळकर, प्रमोद रोडे, आटपाडी पोलिसांनी पहाटेपासूनच चोरटय़ांचा मागोवा घेण्यास सुरूवात केली. ठसेतज्ञ पथकालाही पाचारण करण्यात आले. त्यांनी ज्वेलर्समधील ठसे घेतले.
चोरटय़ांच्या हालचालीचा मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी विविध सीसीटीव्हीचा आधार घेतला. चोरट्यांनी सांगोला तालुक्यातील वाकी येथून एक डमडम चोरून आटपाडी-मुलाणी येथेपर्यंत प्रवास केला आहे. हे डमडम येथेच सोडून तेथून जावेद मुलाणी यांची इको गाडी चोरून ज्वेलर्समधील चोरीसाठी त्याचा वापर केला आहे. आटपाडीतून चोरी करून पळालेल्या चोरट्यांनी पुन्हा ही गाडी बामणी (ता. सांगोला) येथे सोडली आहे. त्यामुळे हे चोरटे सोलापुर जिल्हय़ातून आले व पुन्हा त्याच जिल्हय़ात पलायन केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सांगली पोलिसांनी शेजारच्या सोलापूर जिल्हा पोलिसांशी संधान साधून चोरटय़ांचा माग आरंभला आहे.
आटपाडी पोलिसांना चॅलेंज
पोलीस प्रशासनाने आटपाडी शहरात अनेक चौकात सीसीटीव्ही बसविले आहेत. त्यानंतर पोलीस निवासस्थानाच्या लगतच गोरख गायकवाड यांची सुमारे 4 लाखाची चोरी झाली. त्यानंतर शनिवारच्या आठवडा बाजारात अंडी विक्रीसाठी आलेल्या जनाबाई नांगरे या आजींचे अपहरण करून त्यांचे पिंपरी खुर्द येथील वनिकरण क्षेत्रात दागिने लंपास करून लुटले. त्यानंतर मुख्य पेठेत शंकरबापु चव्हाण यांचे ज्वेलर्स फोडुन चोरट्यांनी मोठा हात मारत पुन्हा एकदा आटपाडी पोलीसांना आव्हान दिले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत शहरातील नागरिक, व्यापाऱयांमधून संताप व्यक्त होत आहे.