प्रतिनिधी /मिरज
शहरातील मिरज-पंढरपूर रस्त्यावर आंबे विक्रेत्याला व त्याच्या मुलाला लोखंडी पट्टीने मारहाण करुन दोन हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली. याप्रकरणी राजू मनोहर गायकवाड (वय 50, रा. समतानगर, आठवी गल्ली, मिरज) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून, अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
राजू गायकवाड आणि त्यांचा मुलगा आदित्य गायकवाड हे दोघे मिरज-पंढरपूर रस्त्यावरील एसबीआय बँकेसमोर आंबे विक्रीसाठी थांबले होते. यावेळी एक अज्ञात तरुण आंब्याच्या टेंपोजवळ आला. त्याने गायकवाड यांना न सांगताच एक आंबा उचलून खाल्ला. गायकवाड यांनी आंबे महाग आहेत, का खाल्लास, असे विचारले असता संबंधीत अज्ञात तरुणाने तू कोण विचारणार, असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच खाल्लेला आंबा या जागेचे भाडे समज, असे म्हणून लोखंडी पाईप आणि दगडाने मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या आदित्य यालाही लोखंडी पाईपने मारहाण केली. बाप-लेकांना मारहाण करुन जखमी केल्यानंतर संबंधीत अज्ञात तरुणाने गायकवाड यांच्या आंब्याच्या स्टॉलवरील पैशांचा गल्ला उखडून त्यातून दोन हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पळून गेला.