नवी योजना लवकरच मार्गी लागणार
जत/प्रतिनिधी
जत शहराला पाणी पुरवठा करणारा बिरनाळ तलाव वर्षातून चार वेळा भरण्याचा आणि नव्या प्रस्तावित पाणी योजनेसाठी जितके पाणी आरक्षित हवे त्यास मंजुरी देण्याचा निर्णय मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आ. विक्रमदादा सावंत यांनी दिली. या बैठकीत तालुक्यातील 29 तलाव भरण्याचाही निर्णय घेण्या आला.जेणेकरून तालुक्यातील गाव पाणी पुरवठ्याचा विषय देखील मार्गी लागणार आहे. या बैठकीस पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ही उपस्थीत होते.
आ. सावंत म्हणाले, जत शहराच्या नळपाणी पुरवठा योजनेकरिता बिरनाळ तलावामध्ये पाणी आरक्षित करून मिळणेबाबत आज मंत्रालय मुंबई येथे बैठक पार पडली. या विषयासाठी आपण सतत पाठपुरावा केला होता. आज मंत्रालयात जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील,पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,संबंधित विभागाचे सचिव,अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली.बिरनाळ तलाव वर्षातून २ वेळा म्हैसाळ योजनेच्या पाण्याने भरला जात होता . आता तो जत शहराच्या पिण्याच्या पाण्याकरिता वर्षातून ४ वेळा भरून देणेबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत झाला .त्यामुळे जत शहरासाठीच्या नवीन नळ पाणीपुरवठा योजना सुरु करणेच्या कामातील एक महत्वाचा टप्पा आज पार पडला.त्यामुळे जत शहराच्या वाढीव लोकवस्तीसह संपूर्ण जत शहरास पिण्याचे पाणी कमी पडणार नाही.त्यामुळे जत शहराचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
तसेच जत तालुक्यातील १२ तलावांना म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी जाऊ शकते , त्यातून २९ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. या विषयावर बैठकीत चर्चा झाली. सदरच्या तलावांची दुरुस्ती करून लवकरच पाणी सोडणेबाबत नियोजन करण्याचे आदेश मंत्री महोदय यांनी दिले.या बैठकीस जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनकर खरात, जत नगरपरिषद जतचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे , राष्ट्रवादी नेते रमेश पाटील, जिल्हा बँक संचालक सरदार पाटील ,माजी नगरसेवक निलेश बामणे उपस्थित होते.
आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले जत शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याचे अभिवचन मी दिले होते. ते आज पूर्ण करू शकलो याचे समाधान आहे. बिरनाळ तलावात पाणी आरक्षण होणे अतिशय महत्त्वाचे होते, त्याशिवाय नवी योजना होऊ शकत न्हवती. त्यादृष्टीने आज मुंबई मंत्रालय येथे बैठक होऊन निर्णय देखील झाला. आता नवी योजना मार्गी लावू. जत शहराच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही. लोकांना यापुढे स्वच्छ आणि मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.
ना. जयंत पाटील यांचे आभार : आप्पा पवार
बिरनाळ तलाव पाणी आरक्षण विषय मार्गी लागल्या बद्दल जत पालिकेचे उपनगाध्यक्ष आप्पा पवार यांनी मंत्री जयंत पाटील यांचे आभार मानले.हा प्रश्न अतिशय महत्वाचा होता, यासाठी आम्ही सतत पाठपुरावा केला होता. आमचे नेते सुरेशराव शिंदे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता.त्यास आज यश आले. आता आमची नवी 65 कोटी रुपयांची प्रस्तावित योजना देखील लवकर मार्गी लागेल. 2019 पासून आम्ही या प्रश्नासाठी पाठपुरावा केला होता. मानसी 135 लिटर पाणी आवश्यक आहे, जे आज आम्ही पुरऊ शकत नाही. पण आता लवकरच हे काम पूर्ण करून घेऊ. पालिकेच्या सर्वच सदस्यांनी या कामासाठी रेटा लावला होता, असेही पवार यांनी स्पष्ट केले.