अग्रणी दुथडी, पाणलोट क्षेत्रात उघडीप
सांगली प्रतिनिधी
आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्याच्या दुष्काळी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जत, कवठेमहाकांळ, आटपाडी आणि कडेगाव तालुक्यात अनेक ओढे नाले भरून वाहू लागले आहेत. अग्रणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तर तासगाव तालुक्यातील सावळजमध्ये ढगफुटी सदृश पावसाने बंधारा फुटला आहे. सांगली, मिरज शहरातही शुक्रवारी दिवसभर संततधार सुरू होती. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाने उघडीप दिली आहे.
सांगली- पेठ रस्त्यांसाठी 945 कोटींचा आराखडा
दुष्काळी भागात झालेल्या दमदार पावसाने बळीराजा सुखावला आहे. परंतू द्राक्षबागांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. सावळज परिसरात अवघ्या चार तासात 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुरूवारी रात्री ढगफुटी सदृश पाऊस कोसळला. या जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात, दुकानात पाणी शिरले, तर अग्रणी नदीला पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले, बंधारा फुटला, शेतातील माती वाहून गेली. केवळ चार तासात तब्बल 80 मिलिमीटर पाऊस कोसळल्याने अनेक भागात नुकसान होवुन जनजीवन विस्कळीत झाले. अग्रणी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने हिंगणगाव कवठेमहांकाळ रोडवरील वाहतूक शुक्रवारी सकाळी बंद पडली होती. काही ठिकाणी रस्ते, मोठया पाईप वाहून गेल्या आहेत.
दरम्यान सावळज वार्ताहर कळवितो की, तासगाव तालुक्यातील सावळजसह परिसरात गुरूवारी रात्री साडेसातच्या सुमारास जोरदार पाऊसाने सुरूवात केली. यामुळे डवरी समाज वस्तीमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरून संसारपयोगी साहित्याचे नुकसान झाले. घरात फुट-दीड फूट पाणी होते. अतिवृष्टीमुळे नदीपात्रात मोठय़ा प्रमाणात पाणी आल्याने नदीला पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे सिद्धेवाडी-यल्लमा पूल, सावळज-जोतिबा मंदिराकडे जाणाया मार्गावरील पुल तर गव्हाण-मजुरी मार्गावरील पूल पाण्याखाली गेले तर बसवेश्वरनगर येथील मौल्याच्या टेकाचा बंधारा फुटला. सिध्देवाडी तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने सांडव्यावरून पाण्याचा मोठय़ा प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने अग्रणी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.
आटपाडी तालुक्यातही अनेक भागात जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. करगणी बाजारात पाणी शिरल्याने भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. गुरूवारी रात्री कवठेमहांकाळ, आटपाडी, कडेगाव, जत आणि तासगाव तालुक्यातील अनेक गावांना मुसळधार पावसाने झोडपले आहे. सांगली शहरासह परिसरातही रात्री आणि शुक्रवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे सखल भागात पाणी साचून राहिले होते. तर शहरातील रस्ते खड्डेमय बनल्याने अपघातांचे प्रमाण वाढले होते. गुंठेवारी भागात तर पावसाने दैना उडाली आहे.
कवठेमकांळमध्ये 53 तर शिराळय़ातून 2 मिमी पावसाची नोंद
गुरूवारी रात्री कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक 53 तर शिराळा तालुक्यात सर्वात कमी 2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर वाळवा इस्लामपूर परिसरत 6, पलूस 8.3, तासगावमध्ये 6, सांगलीत 6, मिरजमध्ये 7.5, विटा 26.5, आष्टा 17.8, जत 21 आणि कडेगाव तालुक्यात 32 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने उघडीप दिली आहे. शुक्रवारी दिवसभर कोयना परिसरात 20, वारणा 4 आणि महाबळेश्वरला अवघा दहा मिमी पाऊस झाला आहे.