कडेगाव,प्रतिनिधि.
Sangli Political News : घराणेशाही संपण्याच्या भीतीने सरपंचाच्या जनतेतून थेट निवडीला महाविकास आघाडी कडून विरोध केला जात असल्याचा आरोप भाजपाचे (BJP) सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख (Prithviraj Deshmukh) यांनी केला.
नगराध्यक्ष आणि सरपंच यांची निवड थेट जनतेतून करण्याचा लोकशाहीला बळकटी देणारा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारने प्रस्थापितांच्या घराणेशाही प्रवृत्तीला चपराक लगवली आहे. सामान्य जनतेतून नेतृत्व पुढे आल्यास ठराविक घराण्याची राजकारणातील मक्तेदारी संपुष्टात येईल या भितीमुळेच विरोधकांनी या निर्णयास विरोध सुरू केला असला, तरी हा निर्णय घेऊन जनतेच्या भावनांचा सरकारने आदर केला आहे,अशा शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
हेही वाचा- Kolhapur: सातवेत एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने परिचारिकेचे प्राण वाचले
सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यास यावी अशी मागणी राज्यातील नऊ हजार ग्रामपंचायतींनी ठराव करून सरकारकडे केली होती. महाराष्ट्र सरपंच परिषदेनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे.जनतेची ही तीच मागणी असताना या निर्णयास विरोध करून विरोधकांनी आपली घराणेशाही मानसिकता स्पष्ट केली आहे असे पृथ्वीराज देशमुख म्हणाले. सामान्य जनतेतून नेतृत्वाचा उदय होऊ नये व सत्तेची सगळी केंद्रे आपल्या मुठीतच राहावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सतत प्रयत्न केले.