रात्रीत कोयनेचा साठा तीन तर वारणेचा साठा दीड टीएमसीने वाढला, पेरण्या 47 टक्के, जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा
जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू झाली असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील मुसळधारेमुळे कोयना धरणातील पाणीसाठा रात्री 2.84 टीएमसीने वाढला आहे. तर वारणा धरणात 1.29 टीएमसीने वाढ झाल्याने या धरणातील साठा गुरूवारी सायंकाळपर्यंत 12.74 टीमसी झाला आहे. जिल्हयात आतापर्यंत 47 टक्क्यापर्यंत पेरण्या झाल्या असून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
तीन दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारपर्यत चोवीस तासात कोयना, वारणा, राधानगरी धरणांबरोबरच महाबळेश्वर, नवजा परिसरात अतिवृष्टी झाली. पाणलोट क्षेत्रात पावसाने काहीसा दम टाकला पण मुसळधार सुरूच होती. कोयना पाणलोट क्षेत्रात 38, महाबळेश्वर 42 आणि नवजा परिसरात 35 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोयना वारणा धरणांच्या साठ्य़ात वाढ
अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठय़ात वेगाने वाढ होऊ लागली आहे. चोवीस तासात कोयना धरणाच्या पाणीसाठयात 2.84 तर वारणा धरणाच्या साठयात 1.29 टीएमसी वाढ झाली आहे. वारणा धरणात बुधवारी सायंकाळी 12.74 तर कोयना धरणात 18.84 टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 18.84 (105.25), धोम 4.20 (13.50), कन्हेर 2.45 (10.10), वारणा 12.74 (34.40), दूधगंगा 7.99 (25.40), (25.40), राधानगरी 2.98 (8.36), तुळशी 1.50 (3.47), कासारी 1.21 (2.77), पाटगांव 1.50 (3.72), धोम बलकवडी 0.92 (4.08), उरमोडी 4.14 (9.97), तारळी 2.11 (5.85), अलमट्टी 53.70 (123).
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेसमध्ये पुढीलप्रमाणे. कोयना-निरंक, धोम-निरंक, कण्हेर-निरंक, वारणा 646, दुधगंगा 700, राधानगरी 1200, तुळशी 50, कासारी 250,
शिराळा तालुक्यात 33.3 मि.मी. पावसाची नोंद
जिह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.2 मिमी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 33.3 मिमी. पावसाची नोंद झाली आहे. जिह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 6.4 (94.8), जत 0.6 (95.8), खानापूर-विटा 2.4 (88.7), वाळवा-इस्लामपूर 11.3 (90.9), तासगाव 3 (74.9), शिराळा 33.3 (228.8), आटपाडी 0.3 (68.4), कवठेमहांकाळ 1.5 (80.8), पलूस 3.1 (54.1), कडेगाव 3.9 (74.1).
अलमट्टीची पातळी 31 ऑगस्टपर्यंत 512 मीटरपर्यंत ठेवा
सध्याचा आणि आगामी महिनाभरातील पाऊस यांचा विचार करता अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 512 मीटर ठेवावी, असे मंत्रालयातील बैठकीत निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी कृष्णा नागरी पूर नियंत्रण समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
समितीने जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सध्या सांगली, कोल्हापूर नदी क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. राधानगरी धरणाचे वक्र दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीला पाणी वाढत आहे. त्याच प्रमाणे महाबळेश्वर व कोयना पाणलोट क्षेत्र परिसरात पाऊस पडत असल्याने कृष्णा नदीला पाणी पातळी वाढत आहे. नरसोबावाडी मंदिर येथे पंचगंगा संगमाजवळ पाणी पातळी आठ फुटानी वाढली आहे. त्यामुळे राजापूर बंधाऱयावर पाणी आले आहे. सध्या हिप्परगी बॅरेजमध्ये 523 पर्यंत पाणीसाठा केला आहे. हिप्पर्गीचे चार दरवाजे उचलले आहेत, ते आता सर्वच उचलावेत कारण वरील परिक्षेत्रात सध्या जास्त पाऊसमान आहे. सांगली-कोल्हापूर परिसरात नदीच्या जवळपास पूर येऊ नये म्हणून दक्षता घेण्याच्या दृष्टीने राजापूर बंधारा येथून जाणारे डिस्चार्ज पेक्षा अलमट्टी धरणातून 60,000 क्युसेस विसर्ग पाणी सोडण्याची कारवाई व्हावी. अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, संजय कोरे, हणमंतराव पवार, निमंत्रक-सर्जेराव पाटील उपस्थित होते.