सासू, नणंद फरार ; कुंभारगाव येथील प्रकरण
देवराष्ट्रे/वार्ताहर
कुंभारगाव ता.कडेगाव येथील लता किरण साळुंखे या महिलेने राहत्या घरात रविवार दि. ११ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस पतीसह सासू कुसुम दिनकर साळुंखे व नणंद सुरेखा हेच जबाबदार असल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला होता. तशी फिर्याद मयत लता यांचा भाऊ अविनाश निवास माने (रा. चिंचणी अं.) यांनी चिंचणी वांगी पोलिसांत दिली. घटनेच्या पाच दिवसानंतर पती किरण साळुंखे याला पोलिसांनी अटक केली असून सासू व नणंद अद्याप फरार आहेत.
फिर्यादीत म्हंटले आहे की, बहीण लता किरण साळुंखे (वय-३२ ) ही कुंभारगाव (ता. कडेगाव) येथे लग्न झाल्यानंतर पाच दिवसापासूनच तिचा नवरा किरण दिनकर साळुंखे (वय ४०), सासू दिनकर साळुंखे (वय ६५) आणि नणंद सुरेखा वय (35) (मु.पो.नेवरी राहणार चिखलहोळ) यांनी लताला घरातील प्रापंचिक कारणावरून मानसिक, शारीरिक छळ करून तिला मारहाण, शिवीगाळ, दमदाटी वारंवार करीत होते व त्रास देत होते. या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून लता किरण साळुंखे यांनी तिच्या सासरी कुंभारगाव येथील राहत्या घरी रविवार दि.११ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येस पती किरण व त्यास मदत करणारे त्याची आई कुसुम व बहिण सुरेखा हेच जबाबदार आहेत असा आरोप करून मयत लता यांचा भाऊ अविनाश माने यांनी तिघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.