प्रतिनिधी/विटा
खानापूर तालुक्यातील लेंगरे ग्रामपंचायतीने विधवा प्रथाबंदी करण्याचा ठराव केला आहे. सांगली जिल्ह्यातील असा ठराव करणारी लेंगरे ही दुसरी ग्रामपंचायत असणार आहे. मासिक सभेनंतर ग्रामसभा घेत या ठरावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे या सभेला महिला चांगल्या संख्येने उपस्थित होत्या.
शनिवारी २१ मे रोजी लेंगरे येथे ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक सुभाष भोते यांनी १७ मेचा विधवा प्रथेविरुद्धचा शासन निर्णय वाचून दाखवला. यावर साधकबाधक चर्चा होऊन उपसरपंच शितल लांब यांनी ठराव मांडला. त्याला शोभा लोंढे यांनी अनुमोदन दिले आणि सर्वसहमतीने ठराव मंजूर करण्यात आला. याअगोदर असे सुधारणावादी ठराव कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड, माणगाव, अकोला, सांगली जिल्ह्यातील बलगवडे. ढोरखेड ग्रामपंचायतीने मंजूर केले आहेत. खानापूर तालुक्यात पहिला आणि सांगली जिल्ह्यातील दुसरा ठराब लेंगरे ग्रामपंचायतीने केला आहे. अशी माहिती सरपंच राधिका बागल यांनी दिली.
समाजात आजही विधवा महिलांना सामाजिक धार्मिक कार्यक्रमांत मान दिला जात नाही. भारतीय राज्यघटनेच्या नुसार महिलांना सन्मानाची वागणूक मिळणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने १७ मे रोजी आदेश काढून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथेविरुद्ध ठराव करावेत, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार खानापूर तालुक्यातील लेंगरे ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार हा ठराव सर्व सहमतीने मंजूर केला आहे.
समाजात विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे, यासाठी विधवा प्रथा बंद करण्यात येत आहे. यासंदर्भात महिला सहभागातून गावामध्ये जनजागृती करण्यात येईल. यासाठी बचत गटांची मदत घेणार आहे. भागाभागातून बैठकांतून यासाठी जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न राहिल, असे सरपंच बागल यांनी सांगितले.
यावेळी सरपंच राधिका बागल, उपसरपंच शितल बागल, ग्रामपंचायत सदस्य दिनकर शिंदे, ग्रामपंचायत सदस्या, संगिता शिंदे, माजी सरपंच प्रशांत सावंत, राणी आयवळे, कलावती गुजले, देविदास शिरसागर, दादासाहेब चंदनशिवे उपस्थित होते. मासिक सभा झाल्यानंतर ग्रामसभेतही हा ठराव करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह ज्येष्ठ नेते श्रीरंग शिंदे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन बागल, जयश्री चव्हाण, नैना कुलकर्णी, मनिषा गुजले, मनिषा आंधळकर, प्राजक्ता शेटे, यास्मिन पिरजादे, बेबिनंदा सगरे यांध्यासह महिला उपस्थित होत्या.