महाराष्ट्राबद्दल अपमान सहन करणार नाही-काटे
प्रतिनिधी / मिरज
मुंबईतून गुजराती, राजस्थानींना बाहेर काढल्यानंतर मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानीही राहणार नाही, या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा सोमवारी मिरज तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. शिवसेनेचे तालुका नेते संजय काटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. राज्यभरात त्यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. उध्दव ठाकरे समर्थक शिवसैनिकांकडूनही रस्त्यावर उतरुन राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात येत आहे.
यावेळी संजय काटे म्हणाले, महाराष्ट्रात भाजपाकडून सुडबुध्दीचे राजकारण सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून शिवसेनेत फोडाफोडी केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने समस्त मराठी मनाच्या भावना भडकल्या आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांच्यावर सुडबुध्दीने कारवाई केली जात आहे. महाराष्ट्रातील तत्कालीन महाविकास आघाडी शासनाने चांगले काम केले होते. या सरकारची चांगली कामे भाजपातील केंद्रीय नेत्यांना बघवली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात अस्थिर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आता शिवसैनिक उतरले आहेत. मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्राबद्दल कोणीही वादग्रस्त वक्तव्य करुन मराठी माणसाचा अपमान केल्यास शिवसेना जशास तसे उत्तर देईल, असा इशारा यावेळी संजय काटे यांनी दिला.