सांगली प्रतिनिधी
दुष्काळी खडकाळ व ओसाड माळरानावर अस्तित्व टिकवून ठेवलेल्या माडग्याळी मेंढीला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळावी यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या राष्ट्रीय समितीच्या (बीआरसी) बैठकीत पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. तसे लेखी पत्र आमदार विक्रमसिंह सावंत यांना दिले आहे.
जत तालुक्यातील माडग्याळला ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याची भीषण स्थिती दर्शवणारे येथील वास्तविक चित्र सबंध महाराष्ट्राला पाहायला मिळते. दुसरीकडे, त्याच मातीत माडग्याळी मेंढीचा जन्म होतो. त्याचे महत्त्व महाराष्ट्रातील जनतेला आहेच; आता देशाच्या कानाकोपऱ्यातही माडग्याळी मेंढीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
तालुक्यातील माडग्याळी मेंढ्यांची संख्या ५६ हजार २५९ आहे; विशेषतः येथे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळसह अनेक राज्यांत या मेंढीला मागणी आहे. अनेक राज्यांतून व्यापारी येथील माडग्याळ बाजारात व्यापारासाठी येतात. लाखो रुपयांची उलाढाल होते; मात्र माडग्याळी मेंढीला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाल्यास उत्पादनक्षमतेसह आर्थिक मूल्य वाढणार असून, मेंढपाळाच्या मुलांना प्रोत्साहन मिळेल, अशी जतकरांना अपेक्षा आहे.