सांगली प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील मिरज येथील प्रांताधिकारी व सांगलीचे मंडळाधिकारी यांच्यासह विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या कारभाराची शासन स्तरावर चौकशी व्हावी, या मागणीसाठी शिवसेना गुंठेवारी विकास समिती (महाराष्ट्र राज्य) प्रदेशाध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीत १५ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११:३० वाजता विराट मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती चंदन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी चव्हाण म्हणाले, मिरजेचे प्रांताधिकारी, सांगलीचे मंडळाधिकारी यांच्या गलथान कारभाराविरोधात शासन स्तरावर चौकशी व्हावी आणि गोरगरिबांना न्याय मिळावा या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्वच जनता १५ जूनला सांगलीत होणाऱ्या विराट मोर्चात सहभागी होणार आहे.
त्यापुढे कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाडस झालं नाही पाहिजे आणि आपला मनमानी कायदा त्या ठिकाणी वापरावा हे कुठेतरी थांबलं पाहिजे, सर्वसामान्य जनतेची कार्यालयांमध्ये दखल घेतली गेली पाहिजे, मनमानी कारभार कुठेतरी थांबला गेला पाहिजे, गौण खनिजाचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे, तो देखील थांबवण्यासाठी भविष्यामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहे. अश्या विविध मागण्यांसाठी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास न्यायालयाची पायरी चढू असा इशारा ही यावेळी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी युवराज माने प्रदेश सदस्य, मारुती देवकर जिल्हाध्यक्ष, विजय बल्लारी जिल्हा उपाध्यक्ष, गजानन हंकारे शहर जिल्हाध्यक्ष, दादा सावंत कवठेमहाकाळ तालुका अध्यक्ष, अमित पवार कार्याध्यक्ष महापालिका क्षेत्र, अमित पाटील जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब वाघमोडे मिरज तालुका उपाध्यक्ष व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.