ऑनलाईन टीम/तरुण भारत
जत तालुक्यातील लवंगा येथील हिंदू साधूंना मारहाण प्रकरणाची सांगली जिल्हा पोलीसानी गंभीर दखल घेतली आहे. तर मारहाण झालेले ते ४ साधू उत्तर प्रदेशमध्ये पोहोचले आहेत. आता त्यांचा जबाब घेण्यासाठी सांगली पोलिसही उत्तर प्रदेशमध्ये पोहोचले आहेत. उमदी पोलीस ठाण्याचे एक पथक साधूंचे जबाब घेण्यासाठी उत्तर प्रदेशात गेलं आहे.
सुमोटो पोलिसांनी तक्रार दाखल केल्याने पुन्हा साधूंचे जबाब पोलिसांना घ्यावे लागणार आहेत. या मारहाण प्रकरणात आज आणखी ५ जणांना पोलिसांनी केली अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी २५ जणांवर गुन्हे दाखल करत सात जणांना अटक केली होती. त्यांना काल न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. आमसिद्ध तुकाराम सरगर, लहू रकमी लोखंडे, नागराज पवार, सागर शिवाजी तांबे, रमेश सुरेश कोळी, सचिन बगौडा बिराजदार व शिवाजी सिद्धराम सरगर यांना सशर्त जामीन मंजूर केला.
नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातून आलेले चार साधू चारचाकीतून विजापूरहून पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. देवदर्शनासाठी निघालेल्या साधूनी लवंगा येथे पंढरपूरचा रस्ता विचारला होता. मात्र, गावातील सरपंच पुत्रासह जमावाने मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून त्या चार साधूंना अमानुषपणे मारहाण केली होती. त्यानंतर या चौघा साधूंना पोलिस येईपर्यंत बंदिस्त करून ठेवले. मात्र मुले चोरणारी टोळी नसून ते साधू असल्याचे समोर आले.
उमदी पोलिसांनी चौघा साधूंवर ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. त्या साधूंनी आमची काहीच तक्रार नसल्याचे सांगत साधू पुढच्या प्रवासाला निघाले. मात्र, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेत अटक करण्यास सुरवात केली.