विटा/प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागाला रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने चांगलेच झोडपले. लेंगरे आणि परिसरात अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेलेल आहेत, तर झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला. वीजेच्या खांबावर झाडे कोसळून काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. मात्र मोठ्या पावसाची अपेक्षा असताना वादळी वाऱ्याने झालेले नुकसान आणि काही वेळातच थांबलेला पाऊस यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली.
खानापूर तालुक्याला मान्सूनपूर्व मोठ्या पावसाची अपेक्षा होती. एप्रिलमधील एखादा अपवाद वगळता वळीवाने हजेरी न लावल्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. अशातच गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला होता. रविवारी दुपारी अचानक वातावरण बदलण्यास सुरूवात झाली. आकाश ढगाने आच्छादून गेले होते. मोठ्या पावसाची अपेक्षा असतानाच वादळी वारे आणि वीजेच्या कडकडाटास सुरूवात झाली. मोठा पाऊस येईल, असे वाटत असताना वादळी वाऱ्याने काही काळातच पाऊस थांबला.
मात्र मोठ्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वाहतूक खोळंबली. काही ठिकाणी वीजेचे खांब पडले, तर काही ठिकाणी वीजेच्या तारांवर झाडे पडल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला. मादळमुठी, भूड, लेंगरे परिसरात काही ठिकाणी घरावरील पत्र्याचे छत उडून नुकसान झाले आहे. एकूणच पावसाने हजेरी लावली असली, तरी मोठ्या पावसाची प्रतिक्षा असताना काही मिनिटातच पाऊस थांबला. मात्र वाऱ्याने केलेले नुकसान शेतकऱ्यांसाठी निराशाजनक होते.