जत, प्रतिनिधी
जत तालुक्यातील बसर्गी येथे शेतात बोअर मारूनही पाणी कमी लागल्याने तसेच कर्जाचा बोजा झाल्याने नैराश्यातून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बाबू ईश्वर बामणे (वय ५४) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, बाबू ईश्वर बामणे यांची गावापासून एक किलोमीटर अंतरावर शेती आहे. काही महिन्यापूर्वी शेतात ८०० फूट बोअर मारली होती. परंतु या बोअरला पाणी कमी लागले होते. तसेच शेतीच्या कर्जाचा बोजा वाढत चालला होता. त्यानी ऊस लागवड केली होती. पण उत्पन्न होत नव्हते. शेतीमुळे कर्जाचा बोजा वाढतच चालला होता.याच नैराश्येतुन आत्महत्या केली आहे. या घटनेची जत पोलिसात नोंद असून अधिक तपास जत पोलीस करत आहेत.