सांगली / प्रतिनिधी
देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन ६ जून , २०२२ रोजी साजरा होत आहे. या दिवशी सांगली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत राहणारी शिवज्योत प्रज्वलित केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर अखंड तेवत राहणारी ही देशातील पहिलीच शिवज्योत ठरणार आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून जगभरात अशी ज्योत स्थापन करणारे तज्ञ यासाठी काम करत आहेत. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरून ही शिवज्योत सांगली येथे आणण्यात येईल. ही ज्योत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ कायमस्वरूपी तेवत ठेवली जाणार आहे.
या शिवज्योत स्थापनेसाठी स्वराज्यातील सिंहगड, अजिंक्यतारा, प्रतापगड, पन्हाळगड, रायगड या पाच किल्यावरची माती तर कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री या नद्यांचं पाणी आणण्यात आलं आहे. आपल्या इतिहासातूनच आपल्याला प्रेरणा मिळते, सांगली शहरातील तरुणांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम व ध्येयवाद कायम तेवत राहावा यासाठी या ज्योतीची स्थापना करण्यात येत आहे अशी भावना या उपक्रमाचे संकल्पक विरेंद्र पृथ्वीराज पाटील यांनी मांडली. शिवछत्रपतींचे स्मरण व नमन करण्यासाठी सर्वानी ६ जून ला संध्याकाळी ६ वाजता या ज्योत प्रज्वलनाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले.
पृथ्वीराज पाटील फाउंडेशन व सर्व शिवप्रेमी यांच्यामार्फत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका आणि शिवप्रेमींच्यावतीने या उपक्रमाला संमती मिळालेली आहे. या उपक्रमाला मंजुरी मिळवण्यासाठी ट्रस्ट व फाऊंडेशनच्यावतीने शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी विनंती केल्यानंतर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या सभागृहात एक व्यापक बैठक घेतली. हा उपक्रम अत्यंत चांगला असल्याचे नमूद करून सर्व पक्ष आणि सदस्यांनी या उपक्रमाला एकमुखी पाठिंबा दर्शवला.