पुणे – कोल्हापुर रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असुन पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन ते वसगडे टप्यातील रेल्वे रुळा खालील खडी पसरण्याचे काम सध्या गतिने सुरु आहे. सांगली- पलूस मार्गावरील नागाव गेट क्रमांक ११८ ते अर्जुनवाड गेटपर्यंत खडी पसरत असल्याने अर्जुने वाटेवरील शेतीकडे जाण्यासाठी रस्ताच उरला नसल्याने शेतकर्यांनी रेल्वेचे काम बंद पाडत रस्त्यासाठी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.
अधिक पहा- LIVE | सांगली जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरूच; दमदार पावसाची प्रतीक्षा
दुहेरीकरण करताना नैसर्गिक पाण्यासाठी असणार्या नाल्याच्या ओघळ वाटा ( म्होरी ) रेल्वे विभागाच्या बांधकाम खात्याने मुजवल्या आहेत. यामुळे शेतामध्ये पाणी तुबंत आहे. या अतिरिक्त पाण्याचा निचरा योग्य मार्गाने होत नसलेने शेती क्षारपडीच्या मार्गावर आहे. रेल्वे विभागाच्या चुकिने वसगडेतील शेतीला याचा फटका बसुन शंभर एकर शेतीत क्षारांचे प्रमाण वाढु लागल्याने उत्पादनात घट जाणवु लागली आहे. हिन्दुस्थान पेट्रोलियम परीसरातील पाणी रानात साचुन राहत असल्याने ऊस मुळकुजीने बाधित आहे. रानातील पाणी निचरा, रस्ते आदी बाबत पुणे कार्यालयातील अधिकार्यांनी आठ महिन्यापुर्वी नाद्रें गावाप्रमाणे शेतीसाठी काँक्रिटचे रस्ते करुन देण्याचे ठोस आश्वासन ही दिले होते. पण प्रत्यक्षात पर्यायी रस्त्याचे काम न करता दुहेरीकरणाचे काम सुरु ठेवल्याने ऐन पावसाळ्यात शेतकर्यांची धांदल उडाली. त्यामुळे संतप्त शेतकर्यांनी रेल्वे दुहेरीकरणाचे काम वसगडेत बंद पाडले आहे.