माजी राज्यपाल राम नाईक यांचे शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र
आटपाडी / प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे मार्गदर्शक शरद पवार यांनी संभाजीनगरच्या नामांतर निर्णयाची पूर्वकल्पना नसल्याचे म्हटले आहे. त्यांचे हे विधान आश्चर्यकारक आहे. सरकारला मार्गदर्शन करणाऱ्यांनीच तक्रार करणे म्हणजे, गंमतीचाच भाग आहे. अशी टीका माजी केंद्रीय मंत्री तथा माजी राज्यपाल राम नाईक यांनी केली.
आटपाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी महविकास आघाडी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार संजय राऊत यांच्यावर प्रहार केला. ते म्हणाले, “शिवसेना आणि भाजप यांना जनतेने विधानसभा निवडणुकीत बहुमत दिले असतानाही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी चुकीचा व्यवहार केला. त्यामुळेच शिवसेना आमदारांमध्ये मोठी घुसमट होती. लोकांमध्ये न जाणे मंत्री आणि शिवसेना आमदारांनाही वेळ न देणे अशा चुकीच्या व्यवहारामुळे शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून बाहेर पडले.” अशा शब्दात माजी राज्यपाल राम नाईक यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले.