सांगली / प्रतिनिधी
देशातील पहिली अखंड “शिवज्योत”सांगलीत प्रज्वलित झाली आहे. पृथ्वीराज पाटील फाउंडेशनकडून शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अखंड तेवत राहणारी ज्योत अर्पण केली गेली आहे. यानिमित्ताने रायगडवरून आणण्यात आलेल्या या शिवज्योतीचे मिरवणुकीने स्वागत करण्यात आले.
शिवरायांच्या चरणी शिवज्योत
सांगलीतील गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशन कडून शहरातील शिवाजी मंडई येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे समोर अखंड तेवत राहणारी ज्योत प्रज्वलित करण्यात आली आहे. शिवराज्यभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी ही ज्योत अर्पण करण्यात आली. ज्योत प्रज्वलित करण्याआधी शहरातून शिवज्योतीची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. ज्यामध्ये हजारो शिवभक्त आणि सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही ‘शिवज्योत’स्थापन करण्यात आली आहे.
मिरवणूक, नेत्रदीपक सोहळा आणि शिवज्योत प्रज्वलित
या शिवज्योत स्थापनेसाठी स्वराज्यातील सिंहगड, अजिंक्यतारा, प्रतापगड, पन्हाळगड, रायगड या पाच किल्यावरची माती तर कृष्णा, कोयना, वेण्णा, गायत्री आणि सावित्री या नद्यांचं पाणी आणण्यात आलं आहे. तर स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरून शिवज्योत सांगली मध्ये मोठ्या दिमाखात सायंकाळच्या सुमारास दाखल झाली. त्यानंतर भव्य दिव्य अशा मिरवणुकीने शिवज्योत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दाखल झाली. त्यानंतर नेत्रदीपक सोहळ्यात महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, पृथ्वीराज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अखंड तेवत राहणारी शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. दिवस आणि रात्र अखंडपणे तेवत राहणारी ही शिवज्योत देशातली ही पहिलीच असल्याचा दावा पृथ्वीराज पाटील केला आहे.