ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ विस्तारित योजनेला मान्यता; साडेतीन हजार कोटींवर रक्कमेची तरतूद
सांगली प्रतिनिधी
पाण्यापासून वंचित असलेल्या गावांसाठी ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ विस्तारित योजना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सुमारे तीन हजार 558 कोटीच्या रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे. जिह्यातील दोनशेवर गावांतील सुमारे एक लाख 17 हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. आगामी दीड ते दोन वर्षात ही कामे मार्गी लागणार असून यानंतर जिल्ह्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, शिवाय जिल्हाही टँकरमुक्त होणार असल्याची माहिती जिह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.
जलसंपदा विभागाने जिह्यातील पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना आगामी दोन ते तीन वर्षात पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. जिह्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही याचे नियोजन केले असल्याची माहिती सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जत तालुक्यातील 64 गावे म्हैसाळ योजनेतून वंचित आहेत. या गावांसाठी सहा टीएमसी पाणी उपलब्ध केले असून याबाबतचा अहवाल अंतिम टप्यात आहे. या योजनेमुळे या गावातील 40 हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार आहेत. टेंभू उपसा योजनेतून खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, सांगोला, माण आणि खटाव तालुक्यातील 109 गावे वंचित होती. सुधारित योजनेसाठी आठ टीएमसी उपलब्ध केले आहे. यामुळे 50 हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार असून यासाठी सुमारे 1200 कोटी खर्चाला मान्यता दिली आहे.
टेंभू विस्तारित योजनेमुळे जिह्यातील सर्व ठिकाणी पाणी पोहोचणार असून एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही. ताकारी, म्हैसाळ जुन्या सिंचनाचे ओपन कॅनॉल बंदिस्त पाईपा लाईनद्वारे करण्याचे ठरविण्यात आले असून कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव आणि कडेगाव तालुक्यातील दहा हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार असून 180 कोटी इतका खर्च होणार आहे. आरग-बेडग उपसा सिंचन योजनेतून परिसरात असणाऱया गावांतील 1100 हेक्टर पाण्याखाली येणार आहे. यासाठी मोहनराव शिंदे कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे यांनी आग्रह धरला होता. 20 कोटींच्या कामाला तत्वता मान्यता दिली आहे. लवकरच कामाला सुरूवात होणार असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
ताकारी-दह्यारी योजनेतून वाळवा तालुक्यातील वंचित भवानीनगर, येडेमच्छिंद्र, लवंडमाची, कि. म.गड आदी गावातील 650 हेक्टर क्षेत्रासाठी पाणी देण्यात येणार असून या योजनेच्या कामाला शासन मान्यता देण्यात आली आहे. कृष्णा कॅनॉल लाईनिंग करण्याच्या 86 किमी कामाला तत्वता मान्यता देण्यात आली आहे. लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल. वाकुर्डे योजना टप्पा दोनसाठी 3.35 टीएमसी पाणी उपलब्ध झाले असून यामुळे 15 हजार 760 हेक्टर क्षेत्राला पाणी येणार आहे. याशिवाय वाळवा तालुक्यातील 20 गावांना पाणी देण्याची निविदा महिन्याभरात निघणार असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले. वारणा धरण दुरूस्ती, गळती रोखण्याची गरज असून यासाठी 60 कोटींचा प्रस्ताव तयार केला असून याला प्रशाकीय मान्यता महिन्याभरात मिळणार आहे.
म्हैसाळ बंधाऱ्याजवळ बॅरेज उभारणार
कृष्णा नदीवर म्हैसाळ येथील बंधाऱयाजवळ सुमारे 200 कोटी रूपये खर्चून बॅरेज उभारला जणार आहे. या कामाला मान्यता मिळाला असून यामुळे या ठिकाणी जादा पाणीसाठा होवून पूर नियंत्रणासाठी फायदा होणार असून म्हैसाळ योजनेसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे. य्ािंमुळे जास्त दिवस पंपिंग सुरू करता येणार असल्याचे सांगून जयंत पाटील म्हणाले, कृष्णानदीकाठी पूरसंरक्षक भिंत बांधण्याबाबत बैठक घेवून चर्चा झाली. भिंत पात्रात बांधायची की, वरती याबाबत मतभेद आहेत.
जलविद्युतचे खासगीकरण नाही
माजी खासदार राजू शेट्टी यांनी जलविद्युत प्रकल्पांचे खासगीकरण केले जात असल्याचा जलसंपदा विभागावर आरोप केला होता. त्यावर जयंत पाटील म्हणाले, ‘जलविद्युतचे खासगीकरणाचा विषय नाही. या प्रकल्पांचे 3 हजार कोटीचे भाडे थकलेले आहे. त्यामुळे विद्युत निर्मिती कंपनीकडून त्या आम्ही ताब्यात घेतल्या आहेत. काही योजना जीर्ण झाल्या आहेत. त्याचा अभ्यास करून पुढे निर्णय घेऊ.’
नवा पीक पॅटर्न
बदलत्या हवामानामुळे शेतकऱयांना डाळिंब आणि द्राक्ष पीक घेणे भीतीचे वाटत आहे. ऊस प्रचंड वाढतो आहे. उसाचे पीक अतिरिक्त होणे परवडणारे नाही. मी लवकरच पीक पॅटर्न बदलण्याबाबत तज्ञांशी चर्चा करणार आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. यशवंत, तासगाव, महांकाली आणि जत कारखाना सुरु झाला पाहिजे. ती जिह्याची गरज आहे. त्याबाबत जिल्हा बँकेच्या माध्यमातून एकरकमी परतफेड योजनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
सांगली विधानसभा आणि लोकसभेचा विचार ज्या-त्या वेळी
सांगली विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने घ्यावा, प्रतीक जयंत पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी झाली आहे. ती तुमच्या संमतीने झाली होती का? तुमची भूमिका काय, या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, ‘या प्रस्तावाबाबत मला काहीच माहिती नव्हते. इथल्या लोकांनी ती भावना व्यक्त केली आहे. निवडणुका लांब आहेत. त्यावर आताच काही बोलण्याची गरज नाही.’ मी महाविकास आघाडीचा मंत्री म्हणून काम करत आहे. आ. अनिल बाबर, आ. सुमनताई पाटील, आ. विक्रम सावंत यांना या कामाची कल्पना आहे. पण, माझ्या हातावर घडय़ाळ